बॉलिवूड सिनेसृष्टीत कलाकारांमधील वाद काही नवीन नाहीत. कधी कधी एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद बऱ्याच वर्षांनी उमटतात. तर काही कलाकारांमधील नाती, मैत्री कायमची संपुष्टात येते. जवळपास चार वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने ऐश्वर्या राय बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. हा किस्सा आज इमरानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आहे.

सुरुवातीला हे प्रकरण फार सामान्य वाटले होते. अगदी आपण एकमेकांची खिल्ली उडवतो तसे. मात्र ऐश्वर्याने तब्बल चार वर्षानंतर याचा वचपा काढला. तिने इमरानसोबत ‘बादशाहो’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटात एकतर इमरान काम करेल किंवा मी अशी अट दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या समोर ठेवली होती असे म्हटले जाते. त्यानंतर इमरानने ऐश्वर्याची माफी देखील मागितली होती. “गिफ्ट हँपर जिंकण्यासाठी जे उत्तर माझ्या डोक्यात आले ते मी दिले. कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती.” असं इमरान म्हणाला होता. मात्र ऐश्वर्याने त्याला माफ केले नाही.

या माफीनंतर दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली, ‘माझ्याबाबतची अत्यंत वाईट टिप्पणी मी आजपर्यंत कोणती ऐकली असेल तर ती म्हणजे, मी खोटी आणि प्लास्टिक आहे.’ असा हा किस्सा इमरानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आहे.