गेल्या काही दिवसात ‘इंडियन आयडल-१२’ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. खास करून किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावल्यानंतर अमित कुमार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर शोमधील पवनदीप रंजन आणि अरुनिता कंजीलाल यांची दाखवण्यात आलेली लव्ह स्टोरी फेक असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांनी या शोवर टीका केली. यातच आता इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा गायक अभिजीत सावंतने रिअ‍ॅलिटी शोवर त्याचं मत मांडलंय.

आज तकशी बोलताना अभिजीत सावंतने रिअ‍ॅलिटी शोच्या बदलत्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केलीय. तो म्हणाला, ” आजकाल मेकर्सना स्पर्धकाच्या टॅलेन्टपेक्षा तसचं त्याच्यातील गुणांपेक्षा त्याला बूट पॉलिश करता येतात का किंवा तो किती गरबी आहे, किंवा याचं आयुष्य किती संघर्षमय आहेत यात जास्त रुची असते. तुम्ही एखादा प्रादेशिक रिअ‍ॅलिटी शो पहा इथं प्रेक्षकांना त्यांच्या फेव्हरेट स्पर्धाकांच्या पार्श्वभूमीबद्दल क्वचितच कल्पना असते. प्रादेशिक शोमध्ये स्पर्धकाच्या गायनाला अधिक प्राधान्य दिलं जातं मात्र हिंदी शोमध्ये स्पर्धकाच्या खडतर आयुष्याला जास्त महत्व दिलं जातं. आता तर शोमध्ये लव्ह स्टोरी दाखवल्या जातात. ” असं म्हणत अभिजीतने खंत व्यक्त केलीय.

प्रेक्षकांना कायम मसाला हवा

यावेळी अभिजीतने एक अनुभव शेअर करत आधीच्या शोचं स्वरूप आणि आताच बदलेलं स्वरूप यावर भाष्य केलंय. तो म्हणाला, “मला आठवतंय एका माझा परफॉर्मन्स सुरू असताना मी गाण्यांचे शब्द विसरलो आणि मी गाणं थांबवलं. मात्र त्यावेळी जजेसनी एकत्रीत निर्णय घेत मला पुन्हा गाण्याची संधी दिली. मात्र हे आताच्या काळात झालं तर नक्कीच अशा प्रसंगाला एखादा शॉक इफेक्ट किंवा वीज कोसळल्याचा इफेक्ट देऊन प्रेक्षकांसमोर मांडलं असतं. अर्थात यात मेकर्ससोबतच प्रेक्षकही जबाबदार आहेत. हिंदी भाषिक प्रेक्षकांना कायम मसाला हवा असतो.” असं अभिजीत म्हणाला.

तर कुशोर कुमार स्पेशल एपिसोडबद्दल बोलताना कोणत्याही गायकाची किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गायकासोबत तुलना करणं चुकीचं असल्याचं तो म्हणाला. प्रत्येकाची गायनाची वेगळी स्टाईल असून प्रत्येकजण आपल्या स्टाईलने आदरांजली देऊ शकतो असंही तो म्हणाला.

गेल्या ५ वर्षांपासून अभिजीतने एकाही बॉलवूड सिनेमासाठी गाणं गायलेलं नाही. गेल्या काही वर्षात तो फक्त स्टेज शो करत आहे. मात्र करोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे स्टेज शो करणंही त्याला शक्य झालेलं नाही. अनेक गायक स्टेज शो करूनच घर चालवत असल्याचं यावेळी अभिजीत म्हणाला. मात्र सध्या कोव्हिडचं कारणं पुढे केलं जातं आहे.

यावेळी अभिजीत म्हणाला, “माझ्या आजुबाजुचे काही लोक मला बऱ्याचदा सिंगिंग सोड आणि काही तरी बिझनेस सुरू कर असं म्हणतात. खूप नकारत्मकता परवली जाते. मात्र तरीही मी माझ्या मेहनतीच्या कमाईने आता स्टुडीओ सुरू केला असून सोला गाण्यांवर फोकस करणार आहे.” असं अभिजीत म्हणालाय.