सलमान खानची बहीण अर्पिता हा सध्या बॉलिवूडसाठी चर्चेचा विषय झाला आहे. १६ नोव्हेंबरला अर्पिता विवाहबध्द होणार असल्याने तिच्या कपडय़ांपासून ते लग्नपत्रिका नेमक्या कोणाकोणापर्यंत पोहोचणार?, अशा अनेक गोष्टी चवीने चर्चिल्या जात आहेत. अर्पिताच्या लग्नाच्या निमित्ताने का होईना पण, सलमानला पुन्हा एकदा त्याच्या लग्नाबद्दल विचार करायला लावणार असे त्याच्या प्रिय मित्राने आमिर खानने म्हटले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत अर्पिताच्या लग्नाचे निमंत्रणे कोणाकोणाकडे पोहोचलीत, हा फार औत्सूक्याचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे सलमान आणि आमिरची घनिष्ठ मैत्री सगळ्यांना माहित असली तरी आमिरच्याही आधी शाहरूखच्या घरी विवाहाची निमंत्रण पत्रिका पोहोचली आहे. हे कळल्यानंतर सलमान आणि शाहरूखमध्ये मैत्री वाढणार असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही, असे आमिरने म्हटले आहे. सलमान-शाहरूखमधले संबंध घनिष्ठ झाले तर ते मला जास्त आवडेल. अर्पिताच्या लग्नाबद्दलच बोलायचे झाले तर त्यासाठी सलमानला मला निमंत्रण देण्याची गरज नाही. त्याच्या बहिणीचे लग्न हे माझ्या बहिणीचे लग्न असल्यासारखे आहे. पत्रिका आली नाही आली.. तरी मला काही फरक पडत नाही, असे आमिरने सांगितले.
मात्र, अर्पिताच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सलमानकडे पुन्हा एकदा त्याच्या लग्नाचा विषय काढणार असल्याचेही आमिरने सांगितले. लग्नाविषयी कितीही बोललो तरी सलमान आपले कधीच ऐकत नाही. पण, काहीही झाले तरी आपण सलमानचा या विषयावर पिच्छा पुरवणार असल्याचे आमिरने सांगितले. याआधीही एका जाहीर कार्यक्रमात सलमान लग्न कधी करणार?, असे बोलून दाखवत त्याने आता लग्न केले पाहिजे, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या या जाहीर विधानावर सलमानलाही विचारणा झाली. मात्र, तेव्हाही सलमानने याबद्दल काही बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे आताही बडे भैय्या म्हणून अर्पिताच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेला सलमान आपल्या मित्राच्या सल्ल्याचा गांभिर्याने विचार करेल की नाही, याबद्दल शंकाच आहे. सलमानला लग्नासाठी राजी करण्यात यश येईल की नाही माहिती नाही. पण, आपण काहीही झाले तरी अर्पिताच्या लग्नालाही जाणार आणि सलमानकडे विषयही काढणार असे आमिरने म्हटले आहे.