अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्युला आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही त्याच्या मृत्युमागील खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपट दिग्दर्शक करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यानंतर करण सोशल मीडियावर सतत चर्चिला जात होता. त्यातच आता कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरसह महेश भट्टवर निशाणा साधला असून सध्या करण आणि महेश भट्ट हे ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत. इतकंच नाही तर, ‘करणला बॉयकॉट करा’, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांची पोलीस चौकशी करण्यात आली आहे. अलिकडेच चित्रपट दिग्दर्शक आदित्य चोप्राची देखील चौकशी झाली असून अद्यापही करण जोहर आणि महेश भट्ट यांची चौकशी कधी होणार असा संतप्त सवाल कंगनाने विचारला होता. त्यानंतर ट्विटवर करण जोहर आणि महेश भट्ट चांगेलच चर्चिले जात आहेत. अनेकांना या दोघांवर टीका केली आहे. तर काहींनी करणला बॉयकॉट करा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी आदित्य चोप्राची चौकशी करण्यात आली. त्यापाठोपाठ महेश भट आणि करण जोहर यांना सुशांतच्या आत्महत्येविषयी कधी प्रश्न विचारण्यात येतील? असंही कंगनाने विचारलं आहे. अजूनही परवीन बाबीचा मृत्यू कसा झाला ते आपल्या सिनेमांद्वारे महेश भट विकत आहेत. ‘भावनाशून्य गिधाडं’ आहेत असे लोक, जे लोकांना मरताना पाहू शकतात अशीही टीका कंगना रणौतने केली आहे.