टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची बातमी ऐकून अनेकांचीच निराशा झाली. कपिलची तब्येत बरी नसल्याने काही सेलिब्रिटी त्याच्या सेटवरुन परतल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. या शोचा एकही नवीन एपिसोड चित्रीत न झाल्यामुळे वाहिनीला याचा फटका सातत्याने बसत होता. त्यामुळेच ‘द कपिल शर्मा शो’ला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतलाय. कपिलची तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा हा शो सुरु करण्यात येईल. वाहिनीच्या या निर्णयावर कपिल शर्माने ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटला आपलं मत व्यक्त केलं.

‘गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने शोला त्याचा फटका बसत होता. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि सुदैवाने वाहिनीने माझा हा निर्णय मान्य केला. लवकरच मी पूर्ण ताकदीनिशी परत येणार आहे. काही दिवसांसाठी मी आराम करणार आहे. सध्या मला माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही व्यग्र वेळापत्रक असेल. त्यामुळे आता आराम करणे गरजेचे आहे. माझ्यावर कोणताही दबाव न आणता मला वेळ दिल्याने मी सोनी वाहिनीचा आभारी आहे,’ असे त्याने या मुलाखतीत म्हटले.

वाचा : अभिनेत्री संजीदा शेख आणि तिच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख- अनुष्का, अक्षय- भूमी, अर्जुन कपूर- अनिल कपूर या सेलिब्रिटींना एपिसोड शूट न करताच परतावे लागले होते. कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नव्हता. जुने एपिसोड प्रसारित करुन प्रेक्षकांना निराश करु नये यासाठी हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ‘द कपिल शर्मा शो’ची जागा ‘द ड्रामा कंपनी’ घेणार आहे.