मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ असं त्यांच्या आगामी मालिकेचं नाव असून सध्या सर्व स्तरांमधून या मालिकेचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या मालिकेचं कौतुक केलं आहे. त्यामुळेच टआपल्या कामाची पोचपावती मिळालीट, असं म्हणत केदार शिंदेंनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यास सारेच जण उत्सुक आहेत. यामध्येच राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर केदार शिंदेंनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.

“आणखी काय पोचपावती हवी??? सुख येणार. आपण ते स्वीकारायला तयार हवं”, असा रिप्लाय केदार शिंदे यांनी दिला आहे.

आणखी वाचा- ‘…तो आनंद सापडेल’; केदार शिंदेंच्या नव्या मालिकेसाठी राज ठाकरे उत्सुक

दरम्यान, “कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. सुखी माणसाचा सदरा ही मालिका येत्या २५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.