यंदाच्या वर्षात सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ मालिका सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मालिकेच्या कथानकामुळे त्यात काम करणारे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. १० वर्षांच्या एका मुलाचे १८ वर्षांच्या मुलीसोबत लग्न लावून दिल्याचे कथानक या मालिकेमध्ये दाखवण्यात आले होते. त्यामुळे बालविवाह प्रथेचा प्रसार करत असल्याचा आरोपही मालिकेवर करण्यात आलेला.

वाचा : PHOTOS अभिनेता आफताब शिवदासानीचा श्रीलंकेत पारंपरिक पद्धतीने विवाह

काही दिवसांपूर्वीच सोनी वाहिनीने कलाकारांनाही न कळवता मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मालिकेचे निर्माते शशी मित्तल आणि सुमीत मित्तल यांनी प्रेक्षकांना नवीन मालिका घेऊन येण्याचे वचन दिलेले. त्यानुसार, रात्री १०.३०च्या वेळेत ‘ये उन दिनो की बात है’ ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत ‘पहरेदार पिया की’मधील कलाकारांचा समावेश नसून, नव्या कलाकारांना संधी देण्यात आलीये.

वाचा : बिहार पूरग्रस्तांना आमिरची आर्थिक मदत

‘ये उन दिनो की बात है’ मालिकेतून अर्शी सिंग आणि रणदीप राय हे दोन नवीन कलाकार टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण करत असून, ते नैना आणि समीर या भूमिका साकारताना दिसतील. ९० च्या दशकात सुरु झालेली यांची प्रेमकथा आजच्या मॉर्डन युगात येऊन पोहोचते यावर मालिकेची कथा आधारित आहे. प्रसिद्ध कॉमेडियन एहसान कुरेशी आणि अभिनेते किरण कुमारसुद्धा मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील.

मालिकेचा प्रोमो पाहता अगदी साधी-सरळ प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा अंदाज येतो. पण, मालिकेत किशोरवयातील प्रेमकथा दाखवण्यात येणार असल्यामुळे निर्मात्यांना ‘पहरेदार पिया की’ मालिकेप्रमाणे पुन्हा कोणत्या वादाला सामोरे जावे लागू नये, अशीच अपेक्षा आहे.