'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिकांनी अनेकांची मने जिंकली होती. पण आता ही मालिका झी युवावर पुन्हा प्रदर्शित होत असल्याने प्राजक्ताने एक मोठा खुलासा केला आहे. एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झालेली आणि आजही सगळ्यांच्या आवडीची असणारी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेची ऑफर स्वीकारण्यास प्राजक्ता नकार देणार होती. नुकताच प्राजक्ताने याबाबत माहिती दिली आहे. हिंदी मालिकेत काम करण्याची तिची खूप इच्छा होती. त्यामुळे उत्तम कथानक असूनही, ही मालिका न स्वीकारण्याचा तिचा विचार होता. मात्र, 'झी'सोबतकाम करायचे आहे, हे कळल्यावर तिच्या आईने, तिला मालिकेसाठी होकार देण्यास सांगितले. "हिंदी मालिकेत काम करायचे असे मी मनाशी ठरवले होते. त्यामुळे 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका न स्वीकारण्याचा निर्णय मी घेणार होते. मात्र, 'झी'सोबत काम करायचे असल्याने, या मालिकेत काम करायची संधी सोडू नये असे मला आईने सांगितले. आज मागे वळून पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजते. अर्थात, या मालिकेत मी काम केले नसते, तरीही ती माझी सगळ्यात आवडती मालिका असती. ही एक उत्कृष्ट मालिका आहे. सध्याच्या काळात, ही मालिका पुन्हा पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वच चाहते खुश आहेत. एक सकारात्मक संदेश, वेगळा विषय आणि मन प्रसन्न करणारी ही मालिका सगळेजण पुन्हा एकदा पाहतील, याची खात्री आहे" असे प्राजक्ता म्हणाली. प्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तिरेखा आजही, सगळ्यांच्या आठवणीत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळेच तिला एक नवी ओळख मिळाली. हिच मेघना आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आहे. आदित्य आणि मेघनाची गोड प्रेमकहाणी, आता 'झीयुवा' वाहिनीवर पाहायला मिळत आहे. ललित आणि प्राजक्ता सोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.