राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या लाठी-काठीच्या विधानावर सध्या देशभरात वादंग माजलं आहे. या वादग्रस्त विधानाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. आता यावरुन अभिनेता परेश रावल यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले परेश रावल?

“गेल्या काही काळात काँग्रेस पक्षाचा आकार बराच वाढला आहे. अगदी महात्मा गांधींच्या दांडी मार्चपासून राहुल गांधींच्या लाठी मारपर्यंत.” अशा आशयाचे ट्विट करुन परेश रावल यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. परेश रावल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील.” अस वक्तव्य त्यांनी केलं होतं. हे वक्तव्य त्यांनी नरेंद्र मोदींच्या दंडा मार वक्तव्यावर टीका करण्यासाठी केलं होतं.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“मला किती लाठ्या मारा. माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही.” असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.