करोना संकटामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. या काळात अनेक उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यात अनेक सेलिब्रिटींनीदेखील त्यांच्यावर ओढावलेल्या संकटांचं कथन केलं आहे. यात अभिनेत्री रश्मी देसाईनेदेखील या लॉकडाउनमुळे तिची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचं सांगितलं आहे.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरणदेखील रखडलं आहे. त्यामुळे सहाजिकचं सेलिब्रिटींनादेखील आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यातच रश्मी देसाईने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीत बोलत असताना सध्याच्या काळात तिला कोणत्या अडचणी येत आहेत हे सांगितलं आहे.

“मला वाटतं या लॉकडाउनच्या काळात आपण सगळेच आर्थिक संकटांना सामोरं जात आहोत. त्यामुळे जर या काळात तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करु शकला नाहीत, तर नक्कीच तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल. या काळात जर तुम्हाला तुमच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत हे समजलं असेल तर अनावश्यक गरजा नक्कीच कमी करा, त्यामुळे तुमचा खर्च आरोआप कमी होईल. सगळं काही ठीक होईल. मला या लॉकडाउनच्या काळात कोणत्याही गोष्टीचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे हे समजलं आहे”, असं रश्मी म्हणाली.

पुढे ती म्हणते, ”बिग बॉस 13’ चं पर्व संपल्यानंतर मी एक मर्सिडीज गाडी घेणार होते. परंतु, आता माझं मत बदललं आहे. माझ्या कामामुळे माझी ओळख आहे आणि त्यामुळेच चाहते माझ्यावर प्रेम करतायेत. माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत किंवा माझी लाइफस्टाइल कशी आहे, यामुळे ते माझ्यावर प्रेम करत नाहीत. या काळात या गोष्टीची मला पुरेपूर जाणीव झाली आहे”.

दरम्यान, लॉकडाउनच्या काही अटी शिथिल केल्यामुळे मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रश्मी सध्या ‘नागिन 4’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.