वाड्याचे रहस्य आणि भूतकाळ समोर आणणार शांभवी

चाहूल या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या लग्नाबद्दल सगळ्यांना बरीच उत्सुकता होती. परंतु लग्नाच्या दिवशीच जेनी बरोबर घडलेल्या घटना आणि तिच्या जीवाला असलेला धोका खरा ठरला आणि तिचा आकस्मिक मृत्यू झाला. पण हे सगळे कोण करत आहे ? या मागे कोणाचा हात आहे ? हे सगळं निर्मलाच करत आहे की कोणा दुसऱ्याचा या मागे हात आहे हे अजून उघडकीस आलेलं नाही. लग्नाच्याच दिवशी जेनीच्या अचानक मृत्यूने वाड्यामध्ये सगळ्यांनाच धक्का बसला. पण आता वाड्यामध्ये कुणाची तरी चाहूल लागली आहे. चाहूल मालिकेमध्ये शांभवीची एण्ट्री झाली आहे. ही शांभवी कोण आहे ? हिच्या येण्याने नक्की वाड्यामध्ये काय होणार आहे ? प्रेक्षकांना पडलेल्या अश्या अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच मिळणार आहेत. शांभवी ही व्यक्तिरेखा रेश्मा शिंदे ही अभिनेत्री साकारणार आहे.

महादेव यांच्या मदतीने शांभवी वाड्यामध्ये येणार आहे. शांभवी ही अतिशय निरागस आणि मनमिळाऊ मुलगी आहे. लहानपणापासून तिला एक दैवी देणगी आहे आणि त्याचाच फायदा वाड्यातील अनेक रहस्य सोडविण्यासाठी शांभवीला होणार आहे. शांभवीला अमानवी शक्ती, आत्मा आणि अघटीत गोष्टींची चाहूल लागते, तिला तिच्या जवळपास असलेल्या या सगळ्या गोष्टी समजतात. वाड्यातील अमानवी, अघटीत गोष्टींच रहस्य समोर आणण्यासाठी शांभवी वाड्यामध्ये आली आहे. भूतकाळ, जेनीच्या मृत्यूचे रहस्य आणि निर्मलाच्या आत्म्याचे गूढ शांभवी उघडकीस आणणार आहे. तसेच सर्जेराव आणि शांभवी या दोघांमध्ये मैत्री होणार का? त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये होणार की नाही ? जेनीच्या मृत्यूचे रहस्य आणि निर्मलाच्या आत्म्याचे गूढ उघडकीस आणण्यास निर्मलाची साथ शांभवीला लाभणार की निर्मला अडथळे निर्माण करणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.

हे सगळ जाणून घेण्यासाठी तुम्हाला चाहूल मालिकेचे पुढचे भाग बघावे लागतील.