सध्या बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे त्याचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ आणि दुसरे कारण म्हणजे याच चित्रपटाच्या शेवटच्या सीनबद्दल केलेले वक्तव्य. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रोहितने ‘एका फ्रेममध्ये कतरिनाला कोणी पाहणार नाही कारण त्या सीनमध्ये तीन मुलं चालत असतात आणि मागे ब्लास्ट होताना दिसत आहे’ असे रोहित म्हणाला होता.

रोहितला त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर खुद्द कतरिनाने नेमके काय झाले आहे हे सांगत या प्रकरणाला पूर्णविराम लावला. पण हे प्रकरण येथेच थांबलेले नाही. आता रोहित शेट्टीने कतरिनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या कॉन्ट्रोवर्सीनंतर रोहितने कतरिनाला अनफॉलो केले आहे. तो दोघांमध्ये नेमके काय झाले आहे हे त्यांनाच ठावूक.

नेमके काय म्हणाला रोहित शेट्टी ?
सूर्यवंशी चित्रपटाचा शेवटचा सीन खास शूट करण्यात आला आहे. या सीनमध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. रोहित शेट्टीने या सीनसंबंधी बोलताना म्हटले होते की, “तुम्हाला तीन वेळा हा सीन पहावा लागेल. या सीनमध्ये ब्लास्ट दाखवण्यात आले असून कतरिना कैफही दिसत आहे. जर तुम्ही नीट पाहिलेत तर कतरिनाचे डोळे बंद झाले आहेत. चौथ्या शॉटनंतर कतरिनाने माझ्याकडे येऊन अजून एकदा हा सीन घेऊयात का असे विचारले. त्यावर मी तिला सांगितले की, खरे सांगायचे तर तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही. यावर तिला खूप राग आहे. हे तू कसे काय सांगू शकतोस ? अशी विचारणा तिने केली. ती खूप चिडली होती. त्यावर मी तिला सांगितले की, मागे ब्लास्ट सुरु असताना तिघे चालत येतात. तेव्हा कोणीही तुझ्याकडे पाहणार नाही. मी तोच सीन ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला कतरिनाचे डोळे बंद होताना दिसतील. पण कोण पाहणार?”.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटानंतर ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून अजय देवगण असून रणवीर सिंग पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.