प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते. म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. बऱ्याच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. क्षणात नाती जोडली जातात, क्षणात आयुष्य बहरत, क्षणात जीव जडतो. हा क्षण माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहातो. असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या बाबतीत घडताना दिसतंय. मैत्री, प्रेम, राग-रुसवे यांच्यानंतर आता अनु आणि सिद्धार्थ अखेर विवाहबंधनात बांधले जाणार आहेत.

सध्या अनुच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम रंगत असून अखेर अनु सिद्धार्थच्या नावाची मेंदी लावणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचा अपघात झाला होता. त्याच्या या अपघातानंतर मालिकेतील सारं चित्र बदलली आहेत. कधी काळी अनुचा राग-राग करणारी दुर्गा सिद्धार्थसाठी थेट अनुला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेली होती.

दरम्यान, दुर्गाने झुकतं माप घेतल्यानंतर या मालिकेला नवं वळण मिळालं आहे. त्यामुळेच आता मालिकेत एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. सध्या या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे.  तसंच सिद्धार्थच्या प्रकृतीतही हळूहळू सुधारणा होत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनाही या दोघांच्या लग्नाचे वेध लागले आहेत.