‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ या दोन चित्रपटांतून परेश रावल, अक्षयकुमार आणि सुनील शेट्टी यांनी रुपेरी पडद्यावर उडवलेली धमाल अद्याप प्रेक्षक विसरलेले नाहीत. त्यातही ‘हेराफेरी’मधील अफलातून धमाल टीव्हीवर पुन:पुन्हा पाहायला मिळण्याची मजा प्रेक्षक लुटत असतात. दोन चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेले रावल-शेट्टी ही जोडी पुन्हा एकदा ‘हेराफेरी’च्या तिसऱ्या भागाद्वारे प्रेक्षकांसमोर अवतरणार असून यात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम ही ‘दोस्ताना’ जोडीही पाहायला मिळणार आहे. या भागात अक्षयकुमारच्या भूमिकेला मात्र वाव नसल्यामुळे तो या चित्रपटात नसेल, अशी माहिती दिग्दर्शक नीरज व्होरा यांनी दिली. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हेरीफेरी’ चित्रपटामध्ये रावल-शेट्टी-अक्षयकुमार या त्रिकुटाची उत्तम गट्टी जमली होती. परंतु, त्यानंतर आलेल्या ‘फिर हेराफेरी’चे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केले होते. आता तिसऱ्या भागाचे दिग्दर्शनही नीरज व्होरा हेच करणार आहेत.
बाबूराव आपटेचा फक्त फोटो डॉनकडे आहे आणि या फोटोवरून त्याला शोधून त्याच्याकडून महत्त्वाचा ऐवज डॉनला हवा आहे. बाबूराव आपटेसोबत त्याच्यासोबतचे लोकंही आपल्याविरुद्धच्या कटात सामील आहेत असा डॉनला संशय आहे. म्हणून डॉन बाबूराव आपटेसोबत असलेल्या अभिषेक बच्चन आणि सुनील शेट्टी यांचे अपहरण करतो अशा स्वरूपाचे कथानक ‘हेरीफेरी’च्या तिसऱ्या भागाचे असेल. डॉनच्या भूमिकेसाठी अद्याप कोणत्याही कलावंताची निवड झालेली नाही. मार्चमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण सुरू केले जाणार असून डिसेंबर १८ रोजी तो प्रदर्शित करण्याचा मानस असून लास वेगास, मकाऊ, दुबई आणि अबूधाबी येथे सिनेमा चित्रित केला जाणार असल्याचे नीरज व्होरा म्हणाले.