विराटला आपल्या प्राथमिकतांचे चांगले ज्ञान असून, चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबरच्या मैत्रीमुळे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे क्रिकेटवीर विराट कोहलीचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे म्हणणे आहे. विराट १० वर्षांचा असतापासून त्याचे प्रशिक्षक त्याला ओळखतात. विराटचे सगळे लक्ष आपल्या खेळावर केंद्रित असून, आपल्या प्राथमिकता काय आहेत याचे त्याला भान असल्याचे राजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये विराटची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. विराटची बाजू घेताना त्याला आपल्या भावना जवळच्या माणसाकडे व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे त्याचे प्रशिक्षक म्हणाले. तो २५ वर्षांचा एक तरूण असून, जे काही तो करत आहे त्याची त्याला चांगल्याप्रकारे जाण आहे. वैयक्तिक आयुष्य योग्यप्रकारे हाताळण्याइतका तो निश्चितच प्रगल्भ आहे. आपल्या मनातल्या भावना जवळच्या माणसाकडे व्यक्त करून जर त्याला बरे वाटत असेल, तर तसे करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. निश्चितच त्याच्या खेळावर याचा परिणाम होणार नाही. अनुष्काबरोबरचे विराट कोहलीचे संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने, तर आयपीएलच्या सातव्या पर्वात विराट कोहलीचे स्वयंवरदेखील आयोजित केले होते. कॉफी विथ करण कार्यक्रमात अनुष्का शर्माला विराटविषयी बोलते करण्यासाठी करण जोहरने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. असे असले तरी या दोघांच्या मैत्रीबाबत नेहमीच संधिक्तता राहिली आहे.