मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ याला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणच्या नावाची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतंच या चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सायली संजीव हिने प्रतिक्रिया दिली.

प्लॅनेट मराठीने नुकतंच इन्स्टाग्रामवर सायली संजीवचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल सायली संजीव प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ही प्रतिक्रिया देताना सायली संजीव खूप भावूक झाली.

सायली संजीवची भावूक प्रतिक्रिया

“नमस्कार मी सायली संजीव, चित्रपटाला पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला अजिबात शक्य नाही. मला खूप आनंद झालाय. मला बाबांची फार आठवण येतेय. कारण त्यांची फार इच्छा होती की एखादा मोठा आणि मानाचा पुरस्कार मला मिळावा. गोष्ट एका पैठणीची हा आतापर्यंत माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट आहे आणि कायम राहिल.

यासाठी सर्वात आधी अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी या सर्वांचे मनापासून आभार. तसेच शंतानू रोडे यांचेही आभार. या चित्रपटाची संपूर्ण टीमचेही मी मनापासून अभिनंदन करते. त्यासोबतच मला गोष्ट एका पैठणीची यात काम करायला मिळालं यासाठी मी स्वत:ला धन्य समजते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार”, असे तिने यात म्हटलं आहे.

दरम्यान मराठी चित्रपटांच्या विभागात अभिनेत्री सायली संजीवच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मी वसंतराव’साठी गायक राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त विशेष उल्लेखनीय फिचर फिल्मसाठी सिद्धार्थ मेननच्या ‘जून’, तर किशोर कदम यांच्या ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांचित’ या चित्रपटांची निवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गोष्ट एका पैठणीची’ची या चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शंतून रोडे यांनी केलं आहे. तर प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी इत्यादी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.