बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यूनंतर दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. त्याचे अनेक चाहते त्याची आठवण काढताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केले. यावेळी तिने त्याच्यबद्दलच्या अनेक आठवणीही ताज्या केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरे सहभागी झाली होती. यावेळी तिने तिचा चित्रपट, माझी तुझी रेशीमगाठ मालिका, खासगी आयुष्य यांसह अनेक गोष्टींवर भाष्य केले. यावेळी तिला पवित्र रिश्ता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने याबद्दल भाष्य केले. यावेळी तिला त्या घटनेनंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नावरही तिने उत्तर दिले.
आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

प्रार्थना बेहरे काय म्हणाली?

“मला सुरुवातीला सुशांत असे काही करु शकतो हे पटतच नव्हते. तो हे करुच शकत नाही. कारण ज्या सुशांतला मी ओळखायचे किंवा ज्याला आम्ही जवळून बघितलं होतं, त्याला आयुष्यात खूप काही काही करायचे होते. मी, अंकिता आणि सुशांत आम्ही तिघांनी एकत्र खूप वेळ घालवला आहे. अनेकदा रात्री पॅकअॅप झाल्यानंतर आम्ही बँडस्टँडला जाऊन बसायचो. मला अजूनही आठवतंय की तो शाहरुख खानच्या बंगल्याकडे पाहून म्हणायचा की एक दिवस मी याच्या बाजूला घर घेईन. मी खरं सांगते की जेवढं त्याला चित्रपट करणं हे आवडायचं तेवढंच मलाही त्याची क्रेझ होती. आम्ही तासनतास यावर चर्चा करायचो.

त्याचा आणि माझा जन्म एकाच जानेवारी महिन्यातला. तोही विज्ञान शाखेत शिकलेला विद्यार्थी होता आणि मी पण. त्याची ‘काय पो छे’ आणि माझा ‘भटिंडा’ हा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. अशा अनेक गोष्टी माझ्या आणि त्याच्या आयुष्यातील त्या फारच सारख्या होत्या. आमची मैत्री फारच छान होती. अनेक गोष्टी मला त्याच्या आजही आठवतात. मी अजूनही ते आठवलं की खूप चिडते सुशांतने हे का केल? बाकी करायला खूप काही होतं. पण स्वत:ला संपवणे हा शेवटचा मार्ग नव्हे”, असे तिने सांगितले.

जर त्या ग्रुपमध्ये तो अॅड झाला असता तर…

“एकेकाळी मी देखील फार डिप्रेशनमध्ये होते. तेव्हा मी माझ्या मित्राला सांगितले होते की माझ्या आयुष्यात काहीही घडत नाही. मला हवे ते चित्रपट मिळत नाहीत, रोल मिळत नाही, अशा अनेक गोष्टी मी त्याला बोलली. पण त्यावेळी त्याने मला समजवून सांगितलं की, तू इथून बघ की इथे कितीतरी लहान लहान घर आहेत, त्यात किती लोक असतील ज्यांना प्रार्थना बेहरे व्हायचं असेल. पण जर तू असा विचार करायला लागली तर मग… ? ते मला फार पटलं. कारण मी एकेकाळी जिथे होती आणि आता जिथे पोहोचली आहे तोपर्यंत मी अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. जे माझ्याकडे नाही आहे ते कधीतरी येईल. पण त्या दिवसापासून आतापर्यंत आणि सुशांतच्या मृत्यूनंतर माझ्या नशिबात असेल ते मिळेल तर कधीही हा विचार केला नाही.

मी गेल्या चार वर्षांपासून त्याच्या संपर्कात नव्हते. अंकिताचा ब्रेकअप झाल्यानंतर तो फार वेगळं राहायला लागला. मी एकदा, दोनदा त्याला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला होता. कारण आमच्यात अंकिताचा असायचा आणि तिचा विषय निघाल्यानंतर त्याला आवडायचे नाही. मला यावर नाही बोलायचे असे तो म्हणायचा. पण १ जूनला पवित्र रिश्ताला १० वर्ष पूर्ण झाली होती आणि आम्ही एक ग्रुप बनवला होता. त्यात सर्वजण होते फक्त सुशांत नव्हता. मी त्याच्या एका जवळच्या मित्राला सांगितले की त्याला अॅड कर ना. त्यानंतर अंकितालाही सांगितले की त्याला अॅड करु तुला चालेल ना? तर तिनेही करा असे म्हटले. त्यानंतर मी त्याला विचारले तर त्याला या ग्रुपमध्ये यायचे नाही. त्याच्या १४ दिवसानंतर ही बातमी आम्हाला कळली.

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार की नाही? अखेर ‘झी मराठी’ने दिले स्पष्टीकरण, म्हणाले “आमची रेशीमगाठ…”

जर तो त्यात अॅड झाला असता ना, तर त्याला त्याचे जुने मित्र, गप्पा हे सर्व सुरु झालं असतं आणि तो त्यातून बाहेर पडला असता. तो कोणाशी तरी तो बोलला असता? काही तरी झालं असतं? त्यावेळी मला इतकं वाईट वाटतं की मी स्वत: पुढाकार घेऊन हे सर्व का केलं नाही? एखादा फोन घेऊन मी ते करु शकली असती? जरी तो समोरुन आला नाही तरी मी करु शकले असते. त्यामुळे त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली की सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे मनात ठेवायचं नाही. सरळ बोलून टाकायचं”, असे तिने स्पष्ट भाषेत सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress prarthana behere talk about sushant singh rajput death said after breakup with ankita lokhande nrp
First published on: 15-10-2022 at 14:17 IST