Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरूवारी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एआय-१७१ अहमदाबादहून उड्डाण करत होते अन् अवघ्या काही क्षणात ते खाली कोसळलं. एअर इंडिया विमानाच्या झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमान दुर्घटनेनंतर देशभरातून अनेक नागरिकांनी, कलाकारांनी त्यांचे दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे.
या विमान दुर्घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान एक आश्चर्यकारक व्हिडीओ समोर आला आहे. अपघातानंतर एक भगवद्गीता सापडली आहे. या विमानाच्या भीषण अपघातात सर्व काही जळून खाक झाले. मात्र कागदाची भगवद्गीता जशीच तशी हाती लागल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात भगवद्गीता जशीच्या जशीच तशीच आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर भगवद्गीता न जळल्याबद्दल लोकप्रिय गायिका नेहा सिंहने पोस्ट शेअर केली आहे. नेहाने भगवद्गीता न जळल्याच्या दाव्यावर एक्सवर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे, “जळण्यापासून वाचलेले पुस्तक कदाचित त्याच्या वाचकाला वाचवू शकले नसेल, परंतु ते विमान अपघातासाठी जबाबदार असलेल्या लोकांना आणि सरकारला नक्कीच वाचवेल.”
जलने से बची किताब अपने पढ़ने वाले को तो नहीं बचा पाई लेकिन प्लेन क्रैश के लिए ज़िम्मेदार लोगों और सरकार को ज़रूर बचा लेगी.#planecrash #planecrashahmedabad
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) June 13, 2025
नेहाने शेअर केलेल्या या पोस्टमधून तिने पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे; त्यामुळे नेटकऱ्यांनी पोस्टच्या कमेंट्समध्ये तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. या पोस्टच्या कमेंट्समध्ये “कधीतरी सरकारव्यतिरिक्तही काहीतरी पोस्ट कर”, “जर एखाद्या पुस्तकाबद्दल अडचण असेल; तर स्पष्ट सांगा आणि हे “सिंह” नाटक सोडून द्या. हे कोणते पुस्तक आहे, काय अडचण आहे?”
याशिवाय अनेकांनी ‘जर ही भगवद्गीता नसती आणि हे दुसऱ्या कोणत्या धर्माचे पुस्तक असते तरीसुद्धा तुम्ही अशी पोस्ट केली असती का?’ असा सवालही अनेकांनी नेहाला कमेंट्समध्ये विचारला आहे. शिवाय अनेकांनी तिला ‘सरकारवर टीका करायची असल्यास थेट करावी’ असंही म्हटलं आहे. दरम्यान, नेहाने याआधी अनेक घटनांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच तिने या विमान दुर्घटनेवरुनही सरकारवर टीका केली आहे.