अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचं केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. सीबीआय चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारताच अभिनेत्री अंकिताने लोखंडेनं ट्विटर व इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत सरकारचे आभार मानले.

आभार मानत अंकिताने लिहिलं, ‘ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत आहोत अखेर तो क्षण आला आहे.’ सुशांत नैराश्यात जाणारा व्यक्ती नव्हता असं अंकिताने वारंवार विविध मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. रिया चक्रवर्तीनेही सोशल मीडियावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केली. त्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांची एक टीम मुंबईला पाठवली होती. मात्र मुंबई पोलीस त्यांना सहकार्य करत नसल्याची तक्रार बिहार पोलिसांनी केली. तसंच बिहारवरून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. यानंतरच बिहार सरकार आणि सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीचा मुद्दा उचलून धरला.