एकीकडे हिंदी चित्रपटांचे तिकीट खिडकीवर तळय़ातमळय़ात सुरू आहे, मराठीत अजूनही ‘बाईपण भारी देवा’ची धमाल सुरू असताना मराठी नाटकही मागे राहिलेले नाही. या ऑगस्ट महिन्यात चार नवीन नाटकांची पर्वणी नाटय़रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या चारही नाटकांचं वैशिष्टय़ म्हणजे काही नवीन जोडय़ा आणि लेखक-दिग्दर्शकांमध्येही काही नवीन प्रयोग या नवीन नाटकांच्या निमित्ताने अनुभवता येणार आहेत.
ऑगस्ट महिन्यातील नव्या नाटकांचा धूमधडाका अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाने सुरू झाला आहे. चित्रवाहिनीवरची ही लोकप्रिय जोडी दहा वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. वास्तव आयुष्यातही त्यांची जोडी कमालीची लोकप्रिय आहेच, मात्र या दोघांनी एकत्रित केलेले नाटक, मालिका आणि वेबमालिका सगळय़ांनाच लोकांची पसंती मिळाली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजीत पाटील यांनी केले असून लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. प्रिया आणि उमेश यांच्याबरोबर अभिनेता आशुतोष गोखले आणि अभिनेत्री पल्लवी अजय यांच्याही या नाटकात भूमिका आहेत.
‘जर तरची गोष्ट’ या नाटकाबरोबरच आणखी एका नव्या नाटकाचा शुभारंभ झाला आहे. डॉ. दिनेश रसाळ लिखित, दिग्दर्शित ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ हे नवे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना येणाऱ्या अडचणींवर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या नाटकात नयन जाधव, संदेश तेली, संदीप कांबळे, संदीप गायकवाड आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांची मुख्य भूमिका असलेले ‘चाणक्य’ हे हिंदी नाटकही मराठीत रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते शैलेश दातार यांनी या हिंदी नाटकाचे मराठीत रूपांतरण केले असून दिग्दर्शन प्रणव जोशी यांचे आहे. याशिवाय, आणखी एका नव्या नाटकाच्या जाहिरातीने सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत रमाच्या भूमिकेतून गंमत आणणारी अभिनेत्री अनिता दाते केळकर या मालिकेतील भूमिका संपल्यानंतर कुठल्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती. आता अनिता ‘किरकोळ नवरे’ या नव्याकोऱ्या नाटकाच्या जाहिरातीतून लोकांचं लक्ष वेधून घेते आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता सागर देशमुख यांनी केले आहे. या नाटकात अनिताबरोबर सागर देशमुख आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या दोघांच्याही भूमिका आहेत. नाटकाची निर्मिती अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक आणि दिनू पेडणेकर यांनी केली आहे. ११ ऑगस्टपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा रंगभूमीवर निर्मितीनंतर पहिल्याच प्रयोगासाठी मिळालेला नकार, काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगभूमीवर निवडक प्रयोग करण्याची संधी आणि पुन्हा वादविवादात अडकल्यामुळे थांबवावे लागलेले नाटक म्हणजे प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’. सातत्याने झालेला विरोध पत्करूनही या नाटकाचे आजपावेतो हजार प्रयोग झाले आहेत. सहा वर्षांपूर्वी प्रयोग थांबवण्यात आलेले हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर येत आहे. नव्या नाटकाचे दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून उदय धुरत हे सादरकर्ते आहेत. तर माऊली नाटय़संस्थेतर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाला विविध सामाजिक घटकांकडून तीव्र विरोध झाला असला तरी प्रेक्षकांनी या नाटकाला भरघोस प्रतिसाद दिला. ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ हे नाटक रंगभूमीवर सुरू होते. या नाटकामध्ये शरद पोंक्षे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेल्या ‘हे राम नथुराम’ या नाटकातही शरद पोंक्षे यांनीच ही भूमिका साकारली होती. नव्या नाटकात नथुरामच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू असून ऑक्टोबर महिन्यात नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे.
आता काळ बदलला आहे, त्यामुळे आजच्या पिढीला समजेल अशा शब्दांत हे नाटक मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या नाटकाची तीव्रता जशी आहे तशीच पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. हे नाटक येणाऱ्या प्रेक्षकाला १०० टक्के समजेल. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद नव्याने येणाऱ्या नाटकालाही मिळेल अशी अपेक्षा आहे. -विवेक आपटे, दिग्दर्शक