काही लेखक ना अचानक वाचनात येतात म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दलच काहीच म्हणजे काहीच माहितं नसतं आणि अचानक त्यांचा एखादा विचार किंवा वाक्य वाचता आणि त्याच्याबद्दल वाचायला घेता. माझी आणि व.पु. काळेंची ओळख अशीच झाली अचानक.

व. पु. काळे…. काही चांगल्या माणसांची नावं विचित्र असतात… काळे नावाच्या माणसाचं इतकं शुभ्र मन असू शकतं… यांच ना मी वपुर्झा वाचायला घेतलं तेव्हा ठरवलं की वाक्य आवडेल ते पान फोल्ड करून ठेवायचं… जवळजवळ पन्नास पानांपर्यंत हा नियम वापरला आणि मग कळलं की पन्नास पैकी ३० पानं तर मी फोल्डच केलीयत… खरंच वपुर्झा हे पुस्तक आहेच त्याच्या डिस्क्रीप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे कधीही कुठेही उघडा आणि वाचायला सुरुवात करा…. पार्टनर तर बोलता बोलता लाइफची फिलॉसॉफी शिकवून जातं च्यामारी… एकदा वाचून झाल्यावर आपण परत तेच वाक्य वाचतो आणि मग कळतं अरेच्या काय मस्त लिहीलंय भेंडी हे…. कडक… काहींना सांगितलं की वपूर्झा वाचतोय तर ते म्हणाले अरे अजून तीच पुस्तकं वाचतोयस. याचे दोन अर्थ होतात एक तर ते पुस्तक मराठी वाचकासाठी बेसिक पुस्तक असावे (पुलंची असतात तशी) किंवा आत्ताशी वाचायला घेतलं दोन्ही असलं तरी पॉझिटीव्हच आहे. पण त्या सरांच्या बोलण्याचा टोन थोडा निगेटीव्ह वाटला त्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग वपुर्झात काय घेण्यासारखं आहे. तुकड्या तुकड्यांमध्ये तर आहे पुस्तक असाही अर्थ होतो. तसं बघायला गेलं तर बरंच काही आहे वपुर्झामध्ये घेण्यासारखं. वपूंबद्दल पूर्ण माहिती नेटवर उपलब्ध नाहीय पण वपुर्झा भाग दोन (मेनका प्रकाशन)मधील माहितीनुसार वपुंचा पहिला कथासंग्रह लोंबकळणारी माणसं नोव्हेंबर १९६० ला प्रकाशित झाला होता. सांगायचा मुद्दा इतकाच की २००१ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी ४० वर्षांमध्ये ६०हून अधिक पुस्तके लिहीली. पण या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आजही खूप रिलेव्हन्ट आहेत. वपुर्झाबद्दल सरांनी त्या टोनमध्ये विचारलं तेव्हा वाटलं भेंडी असू दे ना एखादी गोष्ट आवडल्यावर तिच्याबरोबर कंटाळा येईपर्यंत खेळतात ना पोरं तसंच आहे हे पुस्तक… कंटाळा येईपर्यंत वपुमय व्हायला काही हरकत नाही पण इथेही अडचण आहे या माणसाच्या लेखनाचा कंटाळाही येत नाही… आहे ना लोचाच लोचा…

पाहा : शब्दसुमनांचा ‘पार्टनर’

मोठ्या लोकांच लेखन वाचल्यावर दोन गोष्टी असू शकतात असं वाटतं… एक तर मोठ्या लोकांना दूरदृष्टी असते किंवा आपण त्यांनी लिहून ठेवल्यापासून इंचभरही प्रगती गेली नाहीय… यामध्ये वपुंनी तेव्हा करून ठेवलेले मुंबई लोकलचे वर्णन वाचावे… म्हणजे वपु आत्ता काल परवा माझ्या बाजूला उभे राहून प्रवास करत होते का असा प्रश्न पडवा इतकं आजच्या सारखं ताजं लिखाण आहे ते… तसं पुस्तक २००५ ला प्रकाशित झाल्याने आजच्या सारखी परिस्थिती असेल ही… पण याचा अर्थ मागील तपभरात लोकल काय घंटा सुधारलेली नाही… असो वपु तसं सगळ्यांबद्दलच मस्त लिहीतात…

वपुंची कथा सांगण्याची पद्धत भन्नाट आहे. तुम्ही हसत हसत त्यात अडकत जाता आणि विचारचक्र सुरु करून ते तुम्हाला कथेच्या शेवटी ओपन एण्डेड म्हणतात तसं सोडून देतात घे बाबा आता कर पुढचा विचार. मग कथा वाचल्यावर आपण लेखकाच्या मनात शिरू पाहतो पुढे असं असं लिहीलं असतं नाही नाही असं नाही असं लिहीलं असतं. आपल्या आजूबाजूचे कॅरेक्टर किंवा कधीतरी हायपर एक्झॅगरेट केलेले (मराठीत त्याला अतिशयोक्ती) कॅरेक्टर असल्याने ते वाचताना मजा तर येतेच पण आपण त्यांना रिलेट करू पाहतो. हे असं रिलेट करणारे लेखकच यशस्वी होतात हे सांगायला माझ्यासाऱख्या सोम्या गोम्याची गरज नाही तो इतिहास आहे.
वपुर्झाच्या इंट्रोमध्येच लिहीलंय तर हे पुस्तक कधीही उचला आणि वाचायला सुरुवात करा असं आहे. मीही ठरवलं पुस्तक वाचायला सुरु करण्याआधी की ज्या पानावरील वाक्य आवडेल ते फोल्ड करून ठेवायचं. दोन दिवसांनी कळलं अरेच्या ऑल मॉस्ट वाचलेल्या २० पैकी २२ पानं फोल्ड आहेत. कारण वपु लिहीतातचं तसं कधीतरी कुठून तरी मेटाफरमधून सुरु करतात आणि खऱ्या आय़ुष्यात आणून सोडतात तर कधी उलटं तर कधी सगळंच मेटफर तर कधी अगदीच थेट थोड्यात पण लागेल असं. तुम्ही बोट ठेवा त्या विषयावर वपुंनी लिहून ठेवलं असेल असंच वाटतं मला. कारण सेक्स, रेल्वे, स्त्री-पुरुष संबंध, आई, उदासी, मन, हृदय, प्रेम, कागद, वही, विमान, शरीर, हत्ती, घोडा, बटाटा, टिकली, डोळे, समाज, धर्म, जग, देव, विश्व, चंद्र, फुल, तारे, ग्रह, माती, पाऊस, ऊन, वारा, गारा, हात, भविष्य, वर्तमान, भविष्य असं सगळं सगळं सगळं कुठे ना कुठे वपुंनी कव्हर केलंय. न दिसणाऱ्या गोष्टी खूप जास्त सुंदर असतात हे वपु वाचल्यावर जाणवतं अगदी प्रकार्षाने… म्हणजे मन, विचार, प्रेम, बावळटपणा यासारख्या गोष्टींना प्रत्यक्षात आकार वगैरे नाही किंवा त्या दाखवू शकत नाही पण वपुंनी त्यांचे वेगळेपण कायमच मांडले आपल्या लिखाणामधून… materialistic आणि non materialistic अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींबद्दल थेट हृदयाला लागेल इतकं डीप लिहीणं खूप कमी जणांना जमतं त्यातलेच वपु एक होते… काही लेखक मराठीमध्ये जन्माला आले हे त्यांच्यापेक्षा मराठी भाषेचे आणि मराठी भाषिकांचे भाग्य असे म्हणावे लागेल त्या यादीत वपुंचा नंबर लागतो अगदी वर कुठेतरी

कथांमध्ये पण अशी पेरलीयत ना वाक्य जसं गरम गरम पोह्यांवर नाही आपण किसलेलं खोबरं पेरतो आणि मग ते खोबरं पोहे संपेर्यंत पुरवून पुरवून खातो तसंच वपुंच्या वाक्यांच एक वाक्य येऊन गेलं की ते वाचायचं आणि फोल्ड करून ठेवायचं मग पुस्तक संपलं तरी ते खोबरं लक्षात राहतं कायमचं. उत्तम उदाहरण म्हणजे पार्टनर ही कादंबरी.
काही खरे काही खोटं हे ही पुस्तक सुरेख पुस्तक आहे … सगळ्यात खास तो क्लार्कचा किस्सा गच्चीवर पतंग उडवण्याचा…. तेव्हापासून मला कोणी काय कुठे विचारल्यावर ऑफीस उत्तर दिल्यानंतर येणाऱ्या काय करतोय या प्रश्नाला गच्चीवर पतंग उडवतोय असंच उत्तर देतो… भन्नाट व्यक्तीरेखा, डिटेल नाही पण त्या व्यक्तीचा अंदाज येईल इतकं त्याचं व्यक्तीमत्व कथेमध्येच रंगवणं, ही व्यक्ती मला माहितीय असं वाचकाला वाटणं हे वपुंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

वपु काळे पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होते. त्यामुळे सौंदर्यदृष्टी नोकरीचाच भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच वेगळा होता. त्यांच्यामधील लेखक जग पहायचा मग वपु पहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दांचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत अगदी सहज म्हणजे मस्करी मस्करी टाइपमध्ये. इतकं सहज मी मस्करी मस्करीत म्हणलो कारण त्यांच्या एकएका वाक्यावर पुस्तक लिहून काढता येईल किंवा ती स्टोरीचा बेस किंवा थीम म्हणून वापरता येतील अशी होती आता उदाहरणे घ्यायची झाली तर हेच बघा..

पाऊस सर्वांसाठी पडतो पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो
याचा कसाही अर्थ घेता येईल
पहिला रोमॅन्टीक ते दोघे स्कुटीवर फिरतायत, कटिंग, लाँग ड्राइव्ह, भरपूर पाऊस, नावाला घातलेलं विंडशिटर, गाडीत सुरु असणारी गाणी, किकू किकू आवाज करत हलणारे वायपर्स आता या पावसाचा अर्थ रोमॅन्टिक तोच पाऊस २६ जुलैचा असला तर त्याचा अर्थ भयंकर किंवा काहीतरी आव्हानात्म होतो, तोच गावात दुष्काळानंतर पडलेला पाऊस म्हणजे आनंदवार्ताच, तोच पावसातून चालेली अंतयात्रा म्हणजे आनंदवार्ताचं दुसरं टोकं… असे बरेच अर्थ या पावसाचे काढता येतील वपु म्हणतात तसं.

दुसरं वाक्य
खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
हे माझ्याबरोबर रोजच होतं खऱ्याखुऱ्या आय़ुष्यात. वैचारिक लेव्हलला प्रेम, वेळ, एखाद्यात गुंतल्यानंतर केलेले प्रय़त्न या सगळ्या गोष्टी खर्च कॅटेगरीमध्ये बसवून हवा तसा अर्थ घेता येईल. अशा वाक्यांचे पर्वत करता येतील इतकी वाक्य वपुंच्या लेखणीतून पाझरली आहेत.

अनेक गोष्टी ते थेटही लिहायचे उदाहर्णार्थ
> ‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
> कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
> Success is a relative term. More the success more is the number of relatives.

काय झुप्पपपपकन् मनाचा ठाव घेतात ना ही वाक्यं…

कितीही लिहलं तरी न संपणाऱ्या वपू या विषयावर मी इथे थांबतो… अनंत म्हणजे कीती रे? या प्रश्नाला उत्तर देता येत नाही कारण अनंत हे अनंत आहे. तशीच ही पोस्ट लांबत जाईल लिहीत राहिल्यास कारण वपू आणि त्यांचे लिखाण कनेक्ट होण्याच्या बाबतमीमध्ये अनंत शक्यतांनी भरलेलं आहे म्हणूनच इथे थांबतोय…

एखाद्याचा सुंदर बर्थ डे गिफ्ट द्याचं असेल ना अगदी डोळे बंद करूनही तुम्ही वपुर्झा त्याला भेट म्हणून देऊ शकता आयुष्यभर नाव काढेल तो तुमचं…

वपु त्यांच्या कोट्ससाठी आजच्या इंटरनेटच्या जगातही खूप जास्त लोकप्रिय आहेत. ऑडीओ कॅसेट्स आलेला मराठीतला पहिला लेखक म्हणून वपुंची ओळख आहे याबाबतीमध्ये त्यांनी पुलंना पण मागे टाकलंय हे विशेष. तर One liners आणि quotes चा बादशाह म्हणता येईल अशा वपुंचे अनेक कोट्स तुम्हाला सापडतील नेटवर त्यांच्या नावाने सर्च मारलं तर, तरीही जाता जाता वपुंचे आणखी दोन मस्त कोट्स तुमच्याबरोबर सोडून जातोय कारण ब्लॉग हाय पिचवर एण्ड व्हावा अशी इच्छा आहे. ब्लॉग आवडल्यास कमेन्ट लाइक आणि शेअर नक्की करा…

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!