समीर जावळे
आमिर खानचा ‘सरफरोश’ आठवतोय? त्यात नसीरउद्दीन शाह यांनी गुलफाम हसन हे पात्र साकारलं होतं. त्यात एका संवादात ते म्हणतात “दरसल ये तस्सवूर में कंगाली का दौर चल रहा है.” हा संदर्भ नव्या गझल लिहिल्या जात नाही या अनुषंगाने येतो. सरफरोशला २६ वर्षे झाल्यानंतर हा संवाद आठवण्याचं कारण आमिर खानच्या ‘सितारे जमीनपर’ या सिनेमाचा ट्रेलर.
आमिर खान म्हटलं की आठवतं त्याचं बिरुद परफेक्शिस्ट
आमिर खान म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या तोंडी परफेक्शनिस्ट हे त्याच्या मागे लागलेलं बिरुद येतंच. ते कसं लागलं? त्याला शबाना आझमी कशा जबाबदार आहेत हे सगळं आमिरने सांगितलं आहेच. पण ‘सितारे जमींपर’ चा ट्रेलर पाहून प्रश्न पडतो तो म्हणजे आपला हा परफेक्शनिस्ट कॉपी पेस्टचा परफेक्शनिस्ट झालाय का? याचं कारण त्याचे मागचे दोन चित्रपट आणि आता येऊ घातलेला सितारे जमीनपर हा सिनेमा.
सलग दोन रिमेक आपटले तरीही आणखी एक रिमेकच
आमिर खान हा एक हरहुन्नरी आणि भूमिकांबाबत फारच सजग असलेला अभिनेता. ‘दिल चाहता है’च्या शेवटच्या संवादात जेव्हा आमिर अक्षय खन्नाला म्हणतो “हाँ यार परफेक्शन को इंप्रुव्ह करना मुश्किल होता है.” त्यावेळी हे वाक्य आमिरच म्हणू शकतो याचीही मनोमन खात्री पटते. पण २०१८ मध्ये आलेला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आणि २०२२ मध्ये आलेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या दोन चित्रपटांवर शिक्का लागला तो सुपर फ्लॉपचा. ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा ‘कन्फेशन्स ऑफ ए ठग’ या मीडोज टेलर यांनी १८३९ मध्ये लिहिलेल्या कादंबरीवर बेतलेला होता. चित्रपटात आमिर खान, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख अशी मल्टिस्टारर कास्टही सिनेमाला तारु शकली नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे सिनेमाचं फ्रेमिंग. जे थेट ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’शी साधर्म्य साधणारं होतं. त्यामुळे लोकांना हा सिनेमा पटला नाही. थेट नसली तरीही कॉपी होती ज्याची अपेक्षा आमिरकडून नव्हती. यानंतर आला ‘लाल सिंग चढ्ढा’. त्याचाही असाच आपटीबार झाला.
लाल सिंग चढ्ढा हा द फॉरेस्ट गम्पचा रिमेक
‘द फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा टॉम हँक्सने केला आहे. तो १९९४ मध्ये आलेला सुपरहिट सिनेमा होता. या सिनेमाचा देशी अवतार म्हणजे ‘लाल सिंग चढ्ढा’. ‘लाल सिंग चढ्ढा’ची पटकथा लिहिण्यासाठी अतुल कुलकर्णींना १० वर्षांचा कालावधी गेला. तसंच ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक करता यावा याची संमती मिळवण्यासाठीही जवळपास तेवढाच काळ गेला. ‘फॉरेस्ट गम्प’चा ऑफिशियल रिमेक असल्याने फ्रेम्स कॉपी करणं, आशय तोच ठेवून भारतीय मातीतली कथा आणणं हे सगळं आलंच. पण हा चित्रपटही अनेकांना आवडला नाही. बॉक्स ऑफिसवर तर चित्रपट पडलाच पण ओटीटीवरही चालला नाही. शिवाय तो काळ करोनाचा होता, त्यामुळे अनेकांनी हॉलिवूडचे चित्रपट ओटीटीवर पाहिले होते. त्याचाही फटका ‘लाल सिंग चढ्ढा’ला बसला.
पुन्हा आमिर रिमेकच्याच वाटेला
आता दोन चित्रपटांचा इतका अनुभव गाठीशी असतानाही आमिर खानसारख्या संवेदनशील आणि कलात्मक माणसाने पुन्हा रिमेकच्या वाट्याला जावं? होय बरोबर सितारे जमीनपर हा सिनेमा ‘द चॅम्पियन्स’ या इंग्रजी चित्रपटावर बेतलेला आहे. आमिर खानला या सिनेमासाठी तीन मुद्दे घेऊन ट्रोल केलं जातं आहे. पहिला मुद्दा आहे रिमेकचा, दुसरा आहे त्याच्या लूकचा आणि तिसरा आहे नावाचा. ‘तारे जमीनपर नावाचा त्याचा चित्रपट होता, त्यातच एका अक्षराची भर घालून त्याने ‘सितारे जमींपर’ सिनेमा आणलाय म्हणून टीका होते आहे. तर त्याला रिमेक का करावासा वाटला यावरुनही ट्रोलिंग होतंय. तसंच एका महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्याच्या लूकचा.
आमिरच्या लूकवरही होते आहे टीका
‘सितारे जमीनपर’ चा ट्रेलर पाहिला तर लक्षात येतं की आमिरचा हा लूक कुठेतरी पाहिलाय. आठवतंय का तुम्ही हा लूक कुठे पाहिलाय? शाहरुख खानचा ‘चक दे इंडिया’ आठवा. त्यात शाहरुखचा जसा लूक होता तसाच हा लूक आहे. आमिरने लूक कॉपी केल्याची टीकाही ट्रेलर आल्यानंतर होते आहे. शाहरुख आणि आमिर खान हे तर सिनेसृष्टीतले जीवलग शत्रू आहेत. पण तरीही आमिर खानला हे का करावंसं वाटलं असेल? प्रतिभासंपन्न, परफेक्शनिस्ट, सर्जनशील, संवेदनशील अशी सगळी बिरुदं लागली आहेत मग आता मी काहीही केलं तरी चालतं असं आमिरला वाटत असेल का? आमिरने २०१८, २०२२ आणि २०२५ अशा तिन्ही वर्षांमध्ये जे चित्रपट आणले ते रिमेक आहेत.

गजनीही रिमेक होता पण तो लोकांना आवडला, आता मात्र ती स्थिती नाही
आमिरचा ‘गजनी’ही रिमेक होता, पण त्यातली तरल प्रेमकहाणी, आमिरची अॅक्शन हे सगळं सगळं लोकांना भावलं. आमिर खान जे काही करतो ते वेगळं असतं म्हणून लोक त्याच्या चित्रपटाची वाट बघतात. शिवाय बॉलिवूडला रिमेकची खूप जुनी परंपरा आहे. पण सर्जनशील आमिरकडून ही अपेक्षा नव्हती हे मागच्या दोन चित्रपटांमधून त्याला प्रेक्षकांनी सांगितलंय. तरीही त्याला तिसऱ्यांचा रिमेकचाच मोह झाल्याचं दिसतंय. एक काळ होता की देवानंद यांचे चित्रपट खूप चालत असत. नंतर नंतर असं झालं की ते चित्रपट करायचे पण बॉक्स ऑफिसवर ते आपटू लागले होते. त्यांना कुणीतरी विचारलंही होतं की देवसाहेब तुमचे हे चित्रपट कोण पाहतं? तर ते म्हणाले मी पाहतो ना. आमिरवर हे म्हणायची वेळ उद्या येऊ नये असं वाटतं. आमिरच्या तसव्वूरमध्ये कंगालीचा दौर सुरु झाल्याचं हे लक्षण तर नाही ना? असंही वाटून जातंय. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की आमिर परफेक्शनिस्ट आहे, त्याने कॉपी पेस्टचा परफेक्शनिस्ट होऊ नये हीच माफक अपेक्षा.