Amir Khan Talks About Depression : लोकप्रिय अभिनेता आमिर खानचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे. ‘सितारे जमीन पर’च्या स्पेशल स्क्रीनिंगला बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आमिरच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली होती. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला आमिर खानची मुलगी आयरा खान व जावई नूपुर शिखरेसुद्धा उपस्थित होते. आमिर खान अनेकदा त्याच्या मुलांसह कार्यक्रमांना उपस्थित असल्याचे दिसते.
आमिर खानने नुकतच ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याची मुलगी आयराबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लेकीच्या नैराश्याबद्दल सांगितले आहे. त्याची मुलगी आयरा खान नैराश्यात असताना तो काळ त्याच्यासाठीसुद्धा तितकाच कठीण गेल्याचे अभिनेत्याने यामधून म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये आमिर खान म्हणाला, “जेव्हा तुमची मुलं कुठल्या त्रासातून जात असतात तेव्हा पालक म्हणून तुमच्यासाठी ती खूप कठीण परिस्थिती असते. तुम्हाला तुमच्या मुलांची खूप जास्त काळजी वाटू लागते”.
आमिर खान मुलगी आयराबद्दल पुढे म्हणाला, “आयरा नैराश्यातून जात होती तेव्हा ती परिस्थिती फक्त आयरा, रीना (अभिनेत्याची पूर्वाश्रमीची पत्नी) किंवा माझ्यासाठीच नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबीयांसाठीही अवघड होती. आम्ही तिने यातून बाहेर यावं यासाठी शक्य ती प्रत्येक गोष्ट केली”. आमिर पुढे म्हणाला, “आयरा १८-१९ वर्षांची असताना ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली होती आणि एक दिवस मी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्पेनमध्ये होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि तिची परिस्थिती समजताच मी लगेच तिला आणण्यासाठी गेलो आणि तिला घरी घेऊन आलो. खरंच नैराश्यातून बाहेर येणं खूप अवघड आहे आणि दुर्दैवानं आज कितीतरी तरुण मुलं मुली यातून जात आहेत”.
दरम्यान, आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर नुकताच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. आमिर खानसह जिनिलीया देशमुख या चित्रपटातून मुख्य भूमिकेतून झळकत आहे. सध्या त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमिरने राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरू करणार आहे आणि कदाचित हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरू शकतो, असेही अभिनेत्याने सांगितले होते.