आमिर खान त्याच्या खाजगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. आमिरने त्याची पहिली पत्नी रिना दत्तासह वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केलं होतं. या दोघांनी १६ वर्षे एकमेकांसह संसार केला. आमिर व रिना यांना जुनैद व आयरा अशी दोन मुलं आहेत. या जोडीने १६ वर्षे एकमेकांसह संसार केल्यानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. रिना दत्तासह घटस्फोट झाल्यानंतर आमिरने दिग्दर्शिका किरण रावसह लग्न केलं. किरण व आमिर यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. आमिरचं दुसरं लग्नही १६ वर्ष टिकलं, पण नंतर दोघांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता गौरी स्प्रॅटबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.
आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये लग्नसंस्था, घटस्फोट आणि किरण रावबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. ‘झूम’शी संवाद साधताना तो म्हणाला, “भारतात लग्न हा फार महत्त्वाचा विषय मानला जातो. जेव्हा तुमच्या नात्यात कटुता निर्माण होते आणि तुम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेता तेव्हा अनेकांना ते आवडत नाही आणि मलासुद्धा असंच वाटतं की लग्न हा फार महत्त्वाचा विषय आहे, त्याला हलक्यात घेऊ नये. मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे आणि म्हणूनच मी या विषयावर इतक्या मोकळेपणाने सर्वांसमोर बोलू शकतो आणि मी बोलायलाच हवं.” पुढे रिना दत्ता व किरण या दोघींबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना आमिर म्हणाला, “रिनाबरोबरच्या नात्यामध्ये खरं बोलायचं झालं तर आम्ही एकत्र राहू शकत नव्हतो. असंच काहीसं किरणबरोबरही झालं. आमच्या दोघांसाठी, आमच्या कुटुंबीयांसाठी हे मोठं नुकसान होतं. आम्हाला वेगळं होताना आनंद झाला नव्हता, पण अशा काही गोष्टी होत्या, ज्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
आमिर पुढे म्हणाला, किरण व तो जगासाठी नवरा बायको म्हणून आनंदी आहेत असं दाखवू शकले असते, पण यामुळे लग्नसंस्थेचा अपमान झाला असता. आमिर म्हणाला, “मी विचार केला होता की, मी जगाशी खोटं वागून असं दाखवू शकलो असतो की मी व किरण एकमेकांसह आनंदी आहोत, पण ते खोटं वागणं झालं असतं. आम्ही एकत्र आनंदी नसतानाही कायमचे एकत्र राहू शकलो असतो आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीही करू शकलो असतो, पण शेवटी ते सगळं खोटं असलं असतं. आम्हा दोघांनाही तसं करणं योग्य वाटलं नाही, कारण लग्नसंस्थेनुसार ते योग्य ठरलं नसतं”. पुढे आमिर म्हणाला, “नवरा बायको एरवी वेगळे होतात, कारण त्यांचं एकमेकांसह पटत नसतं, एकमेकांसह खूप भांडणं होत असतात. पण, किरण व माझ्यामध्ये कधीच तसं घडलं नाही, कारण आम्ही नेहमी एकमेकांचा आदर केला. आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही ते केलं. आम्ही काहीही लपवलं नाही.” पुढे आमिर खान विनोद करत म्हणाला, “लग्नात सगळे यशस्वी होतात, मी घटस्फोट घेण्यात यशस्वी होत आहे.”
आमिर खानला पुढे दोनदा घटस्फोट झाल्यानंतर लग्न संस्थेबद्दल काय मत आहे असं विचारण्यात आलं होतं. यावर तो म्हणाला, “माझं आजही याबाबत तेच मत आहे. लग्न संस्था हा खूप जुना विषय आहे. मला याबाबत खूप आदर आहे. ही खूप सुंदर भावना आहे की, एखाद्या व्यक्तीला त्यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर घालवावसं वाटतं, त्यामुळे मला त्या प्रत्येक व्यक्तीने हा अनुभव घ्यावा असं वाटतं.”