बॉलीवूड अभिनेता आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून झळकणार आहे. ‘लाल सिंह चड्डा’ नंतर तो या आगामी चित्रपटामधून पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून झळकणार आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या एका कार्यक्रमात आमिर खान म्हणाला होता, ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशानंतर तो नैराश्यात होता, त्यामुळे सुरुवातील ‘सितारे जमीन पर’ चित्रपटासाठी त्याने नकार दिला होता. हिंदी व तामिळ या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.
आमिर खान म्हणाला, तो व दिग्दर्शक आर. एस. प्रसन्न करोनाच्याआधी ‘सितारे जमीन पर’ चित्रपट पूर्ण व्हावा या प्रयत्नात होते, पण तसं झालं नाही. तेव्हा लॉकडाउनच्या काळात आमिर खानने कुटुंबीयांना वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत त्याने दिग्दर्शकालाही सांगितलं. नंतर त्याच्या मुलांनीच त्याला सांगितलं की, तुम्ही चित्रपट बनवणं थांबवू नका आणि त्याने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट केला. पण, या चित्रपटाच्या अपयशामुळे आमिर खान निराश झाला आणि म्हणूनच त्याने ‘सितारे जमीन पर’मध्येही काम न करण्याचा निर्णय घेतला.
आमिर खान याबाबत बोलताना म्हणाला, “मी प्रसन्नला सांगितलं होतं की, मी सध्या नैराश्यात आहे आणि मला ब्रेकची गरज आहे. तो खूप समजुतदार असल्याने मला म्हणाला, मला तुमची परिस्थिती कळतेय, तुम्हाला आता चित्रपट करण्याची इच्छा नाहीये, पण मी तुम्हाला विनंती करतो की निदान या चित्रपटाची निर्मिती तरी तुम्ही करा. मी त्याला यासाठी होकार दिला. तेव्हा आम्ही हिंदीसह तामिळमध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हिंदीमध्ये फरहान अखतर तर तामिळमध्ये शिवकार्तिकेयन झळकणार होता. त्यांना कथाही आवडली होती आणि त्यांच्या तारखाही मिळाल्या होत्या.”
आमिर याबाबत बोलताना पुढे म्हणाला, “चित्रपटाचं काम सुरू होण्यापूर्वी मी कायम दिग्दर्शक व लेखकाबरोबर बसून कथेबद्दल सविस्तर चर्चा करतो. या चित्रपटाच्या कथेच्या वाचनादरम्यान पहिल्याच दिवशी वाचन सुरू असताना मला असं वाटलं की, मी हा चित्रपट का करत नाहीये. यानंतर बऱ्याचदा मला असं वाटलं, त्यामुळे शेवटी मी त्यांना सांगितलं की, मला संहिता खूप आवडली आहे. मला याचा अंदाजा होता की, आता खूप उशीर झाला आहे. पण, आमच्या दिग्दर्शकाने सकारात्मक प्रतिसाद दिला. तो म्हणाला, तुम्हीच आमची पहिली पसंती होतात. नंतर प्रसन्न मला म्हणाला, त्याने फरहान व शिवकार्तिकेयन यांना याबाबत सांगितलं आहे व यासाठी त्यांची माफीसुद्धा मागितली. ते सुरुवातीला नाराज होते, पण नंतर त्यांनी समजून घेतलं.”