हिंदी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक अपयशी चित्रपटांची मालिका दिल्यानंतरही नव्या चित्रपटाबरोबर नव्या उत्साहाने कामाला लागणारा, त्याच तडफेने आपली भूमिका करणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. नवे चित्रपट, नवे प्रयोग करण्याच्या बाबतीत आघाडीवर असलेला अक्षय सध्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यमांसमोर आला आहे. अपयशाने खचून न जाता मी सतत काम करत राहतो, असे अक्षयने या चित्रपटाच्या अनुषंगाने बोलताना सांगितले.

देशाच्या सुरक्षेचा वसा घेतलेले सैनिक प्रसंगी देशासाठी प्राणाची आहुती द्यायलाही तयार असतात. सीमेवर राहून पहारा देत देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच काही सैनिक असेही आहेत जे वेगवेगळया देशात जाऊन आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱ्या शत्रूंना धडा शिकवतात. अशाच दोन सैनिकांची गोष्ट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, असे अक्षयने सांगितले. देशाचे शत्रू हे कोणत्याही एका जातीचे, समाजाचे वा प्रांतापुरते मर्यादित नसतात. ते शत्रू असतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे, या संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ धमाकेदार अ‍ॅक्शन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि पृथ्वीराज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  

हेही वाचा >>> Crew Movie Review : रंजक सफर

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘प्रत्येक चित्रपट करताना कलाकाराला खूप मेहनत करावीच लागते, पण अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी तुलनेने जास्त मेहनत करावी लागते. या चित्रपटासाठी देखील खूप तयारी करावी लागली आहे. पण हा चित्रपट करताना मला फार अभिमान वाटला. माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीतील हा सर्वात उत्तम चित्रपट आहे’. या चित्रपटाच्या निमित्ताने अली अब्बास जफर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. ‘अलीने जेव्हा मला आणि टायगरला ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली, तेव्हाच ती भावली होती. या चित्रपटाचा खलनायक चित्रपटभर चेहऱ्यावर मुखवटा घालून वावरणार आहे. आणि ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमार करणार आहे याचीही कल्पना त्याने तेव्हाच दिली होती. त्या क्षणापासून मी या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक होतो, असे अक्षयने सांगितले. 

या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन अ‍ॅक्शनपटांसाठी प्रसिद्ध असलेले कलाकार एकत्र आले आहेत. टायगर श्रॉफबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना, टायगर हा अत्यंत शांत आणि नियमांचे पालन करणारा अभिनेता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला अत्यंत जवळचा मित्र मिळाला. तो माझ्यासारखाच विचार करतो. माझ्याएवढीच मेहनत घेतो. रात्री लवकर झोपून पहाटे उठून व्यायाम करतो. टायगर जरी स्वभावाने मितभाषी असला तरी तो आपल्या कामातून आपली छाप सोडतो, त्यामुळेच त्याचे भारतात लाखो चाहते आहेत, अशा शब्दांत त्याने टायगरचे कौतुक केले.

स्टंट करताना सुरक्षेचा विचार प्राधान्याने करायला हवा..

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही आपापले स्टंट बॉडी डबल न वापरता स्वत:चे स्वत:च करतात. मात्र, स्टंट दृश्य देण्यात माहीर असलेल्या कलाकारांनाही सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करायला हवा, अशी भूमिका अक्षयने मांडली. अ‍ॅक्शन चित्रपटात सतत काही ना काही वेगळे स्टंट अक्षय करतो, म्हणून त्याला खिलाडी ही ओळख मिळाली आहे. आतापर्यंतचा त्याचा कोणता स्टंट सर्वात धोकादायक होता आणि प्रत्येक स्टंट करताना तो काय शिकला? याबद्दल तो सांगतो, ‘मी माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये स्टंट केले आहेत. अ‍ॅक्शन चित्रपट असल्यामुळे काही ना काही धोकादायक अ‍ॅक्शन दृश्ये द्यावीच लागतात. माझ्या मते कोणतीही सावधगिरी न बाळगता चालत्या विमानावर चढणे आणि त्यावर उभे राहून एअर बलूनवर उडी मारणे हा सर्वात धोकादायक स्टंट मी केला आहे. तो स्टंट माझ्यासाठी खरंच एक वेडेपणा होता, परंतु त्यानंतर मी अशा प्रकारे स्टंट न करता स्वत:च्या सुरक्षिततेचा आधी विचार करायला शिकलो. या चित्रपटात देखील अनेक स्टंट मी पहिल्यांदा केले आहेत, पण आता प्रत्येक स्टंट करताना सुरक्षिततेचा विचार मी पहिल्यांदा करतो, असे त्याने सांगितले.

प्रत्येक चित्रपट साकारताना समान मेहनत घ्यावी लागते. मी विनोदी, अ‍ॅक्शन, सामाजिक अशा प्रत्येक प्रकारचे चित्रपट साकारण्यासाठी तेवढेच प्रयत्न करत असतो. मी कोणत्याही एका प्रकारच्या शैलीत सतत काम करत नाही. त्यामुळे एखाद्या चित्रपटाच्या यशामुळे मी फार आनंदाने फुलून जात नाही की अपयशामुळे खचून जात नाही. मी प्रत्येक नवीन चित्रपटात त्याच मेहनतीने काम करत राहतो, यापुढेही मी माझे काम करत राहीन आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.  – अक्षय कुमार