बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकताच कुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. त्यामुळे ममता कुलकर्णी मोठ्या चर्चेत आहे. संन्यास घेण्याबरोबरच अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद दिले गेले आहे. आता मात्र यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीला दिलेल्या पदावर प्रश्न निर्माण केले आहेत. नुकताच त्यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेबरोबर संवाद साधला.

किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी काय म्हणाल्या?

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी म्हटले, “पहिली गोष्ट तर मला अशी विचारायची आहे की, किन्नर आखाडा कोणासाठी तयार केला गेला होता? किन्नर समाजासाठी तयार केला गेला होता. आता मात्र, एका महिलेला किन्नर आखाड्यात स्थान दिले. तर मला असे म्हणायचे आहे की, किन्नर आखाड्यात जर तुम्ही महिलांना स्थान देत असाल, तर त्याचे नाव बदला. दुसरे कोणतेतरी नाव ठेवा. अनेक कलाकार या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आले आहेत. भाग्यश्री, हर्षा रिछारियासुद्धा आली. आम्ही कोणावर कधी टिप्पणी केली नाही. मात्र, आज का हे बोलावे लागते. कारण- ममता कुलकर्णीसारखी फिल्मस्टार, जिचा संबंध डी-कंपनीबरोबर आहे. जी ड्रग्जच्या आरोपाखाली तुरुंगातही गेली आहे. तरीसुद्धा तुम्ही तिला दीक्षा देता आणि कोणतेही शिक्षण न देता तुम्ही तिला महामंडलेश्वरच्या पदावर बसवता. कोणालाही दीक्षा देऊन महामंडलेश्वरच्या इतक्या मोठ्या पदावर बसवाल का? समाजाला तुम्ही कोणता गुरू देत आहात? हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांना महामंडलेश्वर बनवण्यापाठीमागे काय कारण आहे? पट्टा अभिषेक केला. केसांची एक बट कापली आहे, मुंडन केले नाही. संन्यास, दीक्षा घेण्याचे हे कारण आहे का? पहिली गोष्ट तर ममता कुलकर्णीची पार्श्वभूमी बघितली गेली पाहिजे होती. डी-कंपनीबरोबर तिचे संबंध होते. अचानक ती भारतात आली, अचानक ती कुंभ मेळ्यात आली, तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. परत तिला महामंडलेश्वरचे पदसुद्धा मिळाले? तर या सगळ्या गोष्टींमागे काय सत्य आहे? या सगळ्याचा तपास केला पाहिजे. आताच्या काळात पब्लिसिटी स्टंटसाठी आखाडा काहीही करू शकतो. याचा मी निषेध करते.”

दरम्यान, ममता कुलकर्णी ही काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. ममता कुलकर्णीने १९९० च्या दशकात करण अर्जुन आणि बाजी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० च्या काळात ती बॉलीवूडपासून दूर गेली आणि गेली २५ वर्षे ती दुबईत वास्तव्यास होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.