प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा बॉलीवूडमधील ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेता होता. आजवर त्यानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो एक अष्टपैलू अभिनेता आहे. पण गेली कित्येक वर्षं तो कोणत्याच नवीन चित्रपटातून झळकलेला नाही. अशातच आता नुकतंच एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यानं एका मुलाखतीमध्ये गोविंदाबद्दल वक्तव्यं केली आहेत. त्यामध्ये त्यांनी गोविंदानं स्वत: त्याच्या हातानंच त्याचं करिअर संपवलं असल्याचं म्हटलं आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यामुळे गोविंदा व त्यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गोविंदाची मुख्य भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचे गोविंदा व डेव्हिड यांच्याशी चांगले संबंध होते. परंतु, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी डेव्हिड धवन यांनी गोविंदाला भरकटवलं, असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “गोविंदा हा एक अष्टपैलू अभिनेता होता. त्यानं त्याचं करिअर खूप छान सांभाळलं होतं”.

पहलाज निहलानी पुढे म्हणाले, “करिअर छान सुरू होतं. पण, त्याची लोकांवर पटकन विश्वास ठेवण्याची वाईट सवय आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं वातावरण चांगलं नाहीये. त्यामुळे आता तो फार कुठे दिसत नाही”. त्याबरोबरच पहलाज असंही म्हणाले, “गोविंदा कायम ज्योतिषांच्या सहवासात असतो आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं वातावरण या सगळ्यामुळे त्याचं करिअर संपुष्टात आलं”.

पहलाज यांनी सलमान खान व डेव्हिड धवन यांच्याबद्दलही सांगितलं आहे. ते म्हणाले, “गोविंदा खूप भोळा माणूस आहे. तो इतका भोळा आहे की, ‘पार्टनर’ चित्रपटात डेव्हिड धवनला गोविंदानंच काम करावं, असं वाटत होतं; पण तरी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, या चित्रपटाची ऑफर देऊन सलमान व डेव्हिड त्याला मदत करीत आहेत. डेव्हिड धवनबद्दल पहलाज म्हणाले, डेव्हिडनं गोविंदाच्या मनात माझ्याविषयी विष कालवलं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोविंदाची मुख्य भूमिका असलेल्या ‘आँखे’ चित्रपटामुळे डेव्हिड धवन व पहलाज निहलानी यांच्यामध्ये वाद झाले होते. पहलाज निहलानी यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘आँखे’, ‘आग का गोला’, ‘पाप की दुनिया’, ‘दिल तेरा दीवाना’, ‘इल्जाम’, ‘रंगीला राजा’, ‘अंदाज’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती कली आहे.