आजवर अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुही सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत येत असते. करीअरच्या शिखरावर असताना जुहीने तिच्यापेक्षा पाच वर्ष मोठ्या जय मेहता यांच्याशी लग्न केलं. जय मेहता हे मोठे उद्योजक आहेत. जय मेहतांची कहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या किंवा सीरिजच्या कथेसारखीच आहे.
जय मेहता यांचा जन्म एका प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबात झाला. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित महाविद्यालयांमधून अभियांत्रिकी आणि व्यवसायाचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. तेव्हा त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. पण सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता.
आज २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेचे मालक असलेले जय मेहता एकेकाळी कर्जात बुडाले होते. या कठीण काळावर मात करत त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचा व्यवसाय उभारला आणि हे कौतुकास्पद आहे. त्यांचा व्यवसाय कठीण काळातून जात होता, तेव्हा त्यांनी क्रिकेट क्षेत्रात गुंतवणूक केली. याबद्दल त्यांना अनेकांनी ‘वेडा’ ठरवलं होतं; पण तरीही जय यांनी स्वत:वर विश्वास ठेवत ही गुंतवणूक केली.
जय मेहता हे आयपीएलच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’चे सह-मालक आहेत. या संघात त्यांची शाहरुख खानबरोबर भागीदारी आहे. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट आयएमडीच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या चॅटमध्ये जय त्यांच्या क्रिकेटमधील गुंतवकीबद्दल म्हणाले, “माझा व्यवसाय कठीण काळातून जात होता, तेव्हा त्यांना क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. त्यांनी टीम खरेदी करण्यासाठी ७५ दशलक्ष डॉलर्स गुंतवले होते.”
यापुढे जय असं म्हणाले, “ही गुंतवणूक खूपच लहान होती, परंतू, त्यांना खात्री होती की भविष्यात क्रिकेटचं हे क्षेत्र खूप व्यापक होणार. अगदी अमेरिकेतील एनएफएल किंवा युरोपातील फुटबॉलप्रमाणेच. तेव्हा त्यांनी ही संधी ओळखली आणि गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गुंतवणूक ठरली होती. त्यामुळे आज जय मेहता यांची एकूण संपत्ती सुमारे २००० कोटी इतकी आहे.”
दरम्यान, जुही आणि जय मेहता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, १९९५ मध्ये दोघांनी लग्न केलं. जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जुही आणि जय मेहता यांच्या आयुष्यातून महत्त्वाच्या व्यक्ती निघून गेल्यामुळे दोघांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण काळात जुही व जय मेहता यांनी एकमेकांची साथ दिली. अनेक वर्ष मित्र म्हणून राहिल्यानंतर अखेर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.