फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून तीन मित्रांची गोष्ट आणि रोडट्रीप या गोष्टी हिंदी चित्रपट वरचेवर दिसू लागल्या अन् हा जणू एक ट्रेंडच बनला. यानंतर बरेच असे चित्रपट आले पण ‘दिल चाहता है’ला टक्कर देणाऱ्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ची चर्चा आजही होताना दिसते. १२ वर्षं उलटून गेली तरी याचे चाहते या चित्रपटाची अजूनही आठवण काढतात. नुकतंच या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री कतरिना कैफने याच्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.

‘रेड सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नुकतीच कतरिना कैफने हजेरी लावली. यावेळी तिने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं. कतरिना म्हणाली, “आम्ही सगळेच झोयाला या चित्रपटाचा सीक्वल काढायला सांगत आहोत. केवळ त्याची चर्चा आहे म्हणून त्याखातर नव्हे तर खरंच त्या चित्रपटाचा एक उत्तम सीक्वल बनू शकतो असं मला वाटतं.”

आणखी वाचा : सुपरहीट चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखा पाहू?

कतरिनाच्या आधी झोयानेही या या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल भाष्य केलं होतं. झोया म्हणाली, “हा चित्रपट आमच्यासाठी फार जवळचा आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर खरंच दुसऱ्या भागासाठी तितकं उत्तम कथानक मला सापडलं तर मी नक्की करेन. केवळ पैसे कमावण्यासाठी आम्ही दूसरा भाग करू इच्छित नाही. जेव्हा प्रेक्षक हा सीक्वल पाहायला येतील तेव्हा त्यांच्या काही अपेक्षा असतील अन् त्यांच्या त्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या नाहीत तर त्यांचा भ्रमनिरास होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झोया सध्या तिच्या आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासारखे बरेच स्टारकिड्स मुख्य भूमिकांमध्ये आहेत. याबरोबरच झोया आणि फरहान मिळून ‘जी ले जरा’ या चित्रपटावरही काम करत आहेत. हा चित्रपटही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’सारखाच असणार अशी चर्चा आहे. यात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.