‘केजीएफ’ स्टार यशने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलंय. त्याच्यामते, आपण भारताचे लोक आहोत आणि आपण सगळे एक आहोत, त्यामुळे असा भेदभाव आणि तुलना केली जाऊ नये. तसेच त्याने आपल्या चाहत्यांना आणि कर्नाटकातील लोकांना बॉलिवूडचा आदर करण्याचं आवाहन केलंय. चित्रपट उद्योगाशी संबंधित अभिनेते किंवा दिग्दर्शक या नात्याने दर्जेदार चित्रपट निर्माण होणे हे सर्वांच्याच फायद्याचे आहे, असंही त्याने म्हटलंय.
“कर्नाटकच्या लोकांनी इतर कोणत्याही फिल्म इंडस्ट्रीला कमी लेखावं, असं मला वाटत नाही. कारण जेव्हा आमच्याबरोबर हे घडलं, तेव्हा आम्हाला अशाच समस्यांचा सामना करावा लागला होता. इंडस्ट्रीत आता असलेला मान मिळवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आपण तो त्रास सहन केलेला असताना आम्ही इतर कोणाशीही त्याच पद्धतीने वाईट वागू शकत नाही. आपण सर्वांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे कर्नाटकच्या लोकांनी बॉलिवूडचा आदर करावा,” असं यश ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला.
“आपण आपल्या देशात चांगले चित्रपट बनवायला हवे, चांगली चित्रपटगृहे बनवण्याबद्दल बोलायला हवं. प्रादेशिक वाद तयार करून आपापसांत भांडण्याऐवजी आपण एकत्र येत आंतरराष्ट्रीय मंचावर एकजुटीने जगाशी स्पर्धा करायला पाहिजे,” असं यशने म्हटलंय.
यशचा ‘KGF १’ चित्रपट २०१८ साली आला होता, त्याने दमदार कमाई केली होती. त्यानतंर अभिनेत्याने त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्याचा दुसरा भाग म्हणजेच ‘केजीएफ चाप्टर २’ या वर्षी प्रदर्शित झाला, या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.