Nana Patekar Holy Tantrum : अभिनयाचा प्रत्येक पैलू ज्यांनी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर दाखवला असे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. त्यांच्या स्वभावाबद्दलचे अनेक रंजक किस्से ऐकायला येत असतात. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी एका निर्मात्याला भांडी घासायला लावल्याचा किस्सा सांगितला होता. अशातच आता प्रसिद्ध दिग्दर्शिकेने ‘दिशा’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपला संयम गमावल्याचे सांगितलं.

पटकथालेखक आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांनी १९९० मध्ये आलेल्या ‘दिशा’ या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केले होते. त्यांना नानांच्या स्वभावाबद्दल आधीच माहीत होते; परंतु तरीही त्यांनी ओम पुरी आणि शबाना आझमी यांच्याबरोबर नाना पाटेकरांना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. फिल्मफेअरशी साधलेल्या संवादात सई परांजपे यांनी सांगितलं की, नाना यांनी सेटवर अनेकदा राग व्यक्त केला होता. ज्यामुळे सर्वजण स्तब्ध झाले होते.”

याबद्दल सई यांनी सांगितलं, “मला आधी शबाना आणि ओम पुरी यांचे सीन शूट करायचे होते. ज्यात माझे दोन-तीन दिवस जाणार होते. त्यामुळे मी नानाला सांगितलं की, “तुझे सीन आता नाहीत, त्यामुळे तू नंतर ये”. त्यावर मला तो असं म्हणाला की, “माझे सीन नसले म्हणून काय झालं? चित्रपट तर माझा आहे. मी येणार”. त्यानंतर शबाना आणि ओम पुरी यांचे सीन करण्यासाठी मी त्यांच्याबरोबरच होते. तर त्यादरम्यान मी नानाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं त्याला वाटलं असावं.”

अभिनेते नाना पाटेकर (फोटो सौजन्य : इंडियन एक्प्रेस)
अभिनेते नाना पाटेकर (फोटो सौजन्य : इंडियन एक्प्रेस)

सई यांनी पुढे असं सांगितलं, “तीन दिवसांनी शबाना आणि ओम पुरी यांचं शूटिंग झालं आणि ते निघून गेले. मग मी नानाकडे आले. तर शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी चप्पल योग्य नसल्याच्या छोट्याशा कारणावरून त्याने राग व्यक्त केला. त्याचा तो राग पाहून सर्वजण स्तब्ध झाले. मी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत असं कधी पहिलं नव्हतं.” पुढे सई यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीची नानाबरोबर चांगली मैत्री होती आणि तिने त्याला शांत करण्यास मदत केली.

पुढे सई यांनी सांगितलं, “त्यानंतर नानाने पुन्हा एकदा असाच राग व्यक्त केला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याची समजूत काढली होती. पण मग पुन्हा एकदा तिसऱ्यांदा डबिंगच्या दरम्यान त्याने पाने फेकून दिली आणि “मी हे असं करणार नाही” म्हणाला. पण मग तेव्हा मात्र माझा पारा चढला. मी त्याला सांगितले की, “एकतर हे कर किंवा मग इथून बाहेर निघून जा. बस्स झालं तुझं. तू असं का वागत आहेस?” मला असं रागवलेलं पाहून सगळेच माझ्याकडे आश्चर्याने बघत होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे त्यांनी सांगितलं, “यावर नाना मला म्हणाला, “मी जातोय आणि पुन्हा येणार नाही.” तर मीसुद्धा त्याला “जा, हेच योग्य आहे” असं बोलले. पण मग अर्ध्या तासानंतर तो परत आला आणि मला म्हणाला, “तू सुरक्षित आहेस; कारण तू एक महिला आहेस. नाहीतर तू इथे नसतीस” आणि तो पुन्हा बाहेर गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाना शांत झाला आणि त्याने फोन करून त्याचे डबिंग पूर्ण करण्यासाठी शिफ्टची वेळ विचारली. दुसऱ्या दिवशी तो अगदी चांगला होता.”