Nargis warned Sunil Dutt: सुनील दत्त व नर्गिस यांच्या प्रेमकहाणीची चर्चा आजही होताना दिसते. अभिनयक्षेत्रात सुनील दत्त हे नवखे होते आणि त्यावेळी नर्गिस बॉलीवूडच्या सुपरस्टार होत्या. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.

‘मदर इंडिया’च्या सेटवरील एका अपघाताने त्यांना जवळ आणले होते. सेटवर आग लागली होती आणि सुनील दत्त यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून नर्गिस यांचा जीव वाचवला होता. त्या अपघातानंतर नर्गिस यांनी सुनील दत्त यांची काळजी घेतली होती. यादरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १९५८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. १९८१ साली नर्गिस यांचा मृत्यू झाला, त्यावेळी नर्गिस यांचे वय ५२ वर्षे होते.

नर्गिस यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे सुनील दत्त त्या दु:खातून बाहेर येऊ शकले नाहीत. नर्गिस व सुनील दत्त यांची मुलगी नम्रता दत्तने यावर वक्तव्य केले आहे. किश्वर देसाई लिखित दारलिंगजी : द ट्रू स्टोरी ऑफ नर्गिस अँड सुनील दत्त या पुस्तकात नम्रता दत्त यांनी सांगितलेली आठवण नमूद केली आहे. नम्रता दत्तने सांगितलेले, “आईच्या मृत्यूनंतर माझे वडील त्या दु:खातून बाहेर येऊ शकले नाहीत. ते काम करत नसत. ते नैराश्यात गेले होते. त्यांनी तिला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. माझ्या वडिलांना वाटलेले की ते आईला वाचवू शकतील. पण, असे घडले नाही. ते ऑफिसला जायचे, चालण्यासाठी जायचे, पण ते कोणाशी बोलायचे नाहीत.”

सुनील दत्त यांची लहान मुलगी प्रिया दत्त यांनी काही दिवसांपूर्वी विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिनेदेखील नर्गिसच्या मृत्यूनंतर वडील सुनील दत्त नैराश्यात गेले होते असे वक्तव्य केले होते. ते पहाटे ३-४ वाजता उठायचे आणि स्मशानात जायचे. ते रात्री झोपायचे नाहीत. काम करायचे नाहीत, ते काहीच करायचे नाहीत, असे वक्तव्य प्रिया दत्तने केले होते.

प्रिया दत्त यांनी असेही सांगितलेले की, मी वडिलांबरोबर एकदा रात्री बसले होते. त्यांना आकाशातला एक तारा दाखवला व त्यांना सांगितले की, आईचे आपल्यावर लक्ष आहे. तसेच आपल्याला इजा होऊ नये म्हणून ती आपले संरक्षण करत आहे. माझ्या या बोलण्याचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. एका रात्रीत ते बदलले. त्यांच्यात खूप मोठा बदल झाला. त्यांनी सगळ्या सिगारेटी, दारूच्या बाटल्या बाहेर फेकल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांवर म्हणजेच आमच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

सुनील दत्त यांना नर्गिस यांनी स्वप्नात चेतावणी

सुनील दत्त यांनी त्यांचे आयुष्य हळूहळू पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांना असे वाटत होते की त्यांनी शक्य तितक्या लवकर लग्न करावे. त्यांना तीन मुले होती. त्यावेळी त्यांचे वय हे ५२ वर्षे होते. याचदरम्यान, संजय दत्त ड्रग्जच्या आहारी गेले होते. नम्रता व प्रिया दत्त लहान होत्या.

नर्गिस यांची भाची जहिदा हुसैन यांनी किश्वर यांना सांगितलेले, “नर्गिस यांच्या मृत्यूच्या बऱ्याच काळानंतर त्या स्वप्नात आल्या होत्या आणि त्या मला म्हणालेल्या की, तुझ्या काकांना सांग त्यांनी जर दुसरे लग्न केले तर मी त्यांना कधीही शांततेत जगू देणार नाही. जेव्हा मी हे काका सुनील दत्त यांना सांगितले, तेव्हा ते मला म्हणाले की ती तुझ्या स्वप्नात का आली? माझ्या स्वप्नात का आली नाही? माझ्या आयुष्यात दुसरी मिसेस दत्त कधीच असणार नाही. तिला सांग की मी कधीच पुन्हा लग्न करणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २००५ साली सुनील दत्त यांचा मृत्यू झाला. त्यांनी नर्गिस यांच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले नाही.