Nawazuddin Siddiqui Reacts To Discrimination : बॉलीवूडसह ओटीटी विश्वात आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा नवाजचा प्रवास काही सोपा नव्हता. नवाजला त्याच्या रंग-रूपामुळे बऱ्याचदा सिनेमातील प्रमुख भूमिकांसाठी नाकारलं गेलं होतं. भूतकाळातील अशा काही घटनांबद्दल त्याने वेळोवेळी त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच आता अभिनेत्याने पुन्हा एकदा वर्णभेदाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. नयनदीप रक्षित यांच्याबरोबरच्या संवादात नवाजने त्याच्या रंगरूपावर समाजाकडून होणाऱ्या टीकेबाबत, तसेच दिग्दर्शक त्याच्याबरोबर मोठ्या बजेटच्या फिल्म का करत नाहीत? याबद्दलचं मत व्यक्त केलं.
यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या यशापयशाबद्दल असं म्हटलं, “मला अपयशाची आणि टीकेची भीती वाटत नाही. माझ्यासारखे आणि मनोज वाजपेयीसारखे अनेक कलाकार आता यापलीकडे गेले आहेत. मनोज वाजपेयी तर आता बॉक्स ऑफिसवरील यशापलीकडे गेला आहे. त्याला या सगळ्याची काही गरजच वाटत नाही.”
यापुढे नवाज म्हणतो, “लोक आमचे सिनेमे पाहायला इच्छुक असतात, पण त्या सिनेमांना स्क्रीन्सच मिळत नाहीत. जर आमच्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन बघायचं असेल, तर आमच्या सिनेमांना तेवढ्या स्क्रीन्स उपलब्ध करून द्या, मग कळेल किती लोक आमचे सिनेमे पाहतात. दोन प्रकारचे कलाकार असतात – एक प्रेक्षकांचे आणि दुसरे इंडस्ट्रीचे. जे इंडस्ट्रीचे कलाकार आहेत, त्यांचे सिनेमे लोकांना पाहायची इच्छा नसली तरीही दाखवले जातात. पण, ज्या कलाकारांचा सिनेमा लोकांना खरंच पाहायची इच्छा असते, त्यांना केवळ २००-३०० स्क्रीन्स मिळतात, तेही फक्त सकाळी एक शो आणि रात्री एक शो… याबद्दल वाईट वाटतं.”
नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर त्याने ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटाचं उदाहरण देत म्हटलं, “त्यावेळी आम्हाला पुरेशा स्क्रीन्स मिळाल्या नाहीत. जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांनी ‘काय सिनेमे बनवता’ म्हणत खूप टीका केली. पण, तोच सिनेमा जेव्हा ओटीटीवर आला; तेव्हा लोकांनी कौतुक केलं. हे असं खूप कलाकारांच्या बाबतीत घडतं.”
यानंतर रंग-रूपामुळे इंडस्ट्रीकडून टीका झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाकहा उत्तर देत नवाजुद्दीन म्हणाला, “हो, आजही अशी वागणूक सहन करावी लागते. इंडस्ट्रीत आता याबद्दल फारसा विचार केला जात नाह. पण समाजात अजूनही हे आहे. सुरुवातीला अनेक लोक ‘तू अभिनेता वाटत नाहीस’ असं म्हणायचे; तेव्हा खूप वाईट वाटायचं. पण, आता काय करणार? काळा असून इथपर्यंत पोहोचलो, जर गोरा असतो तर आणखीन काय केलं असतं कोण जाणे.”