२०२३ हे वर्षं बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चांगलं गेलं असलं तरी त्याआधीची दोन वर्षं बॉलिवूडची अवस्था बरीच बिकट होती. कोविडमुळे प्रेक्षकांचं चित्रपटगृहाकडे कमी येणं आणि खासकरून याचदरम्यान बॉलिवूडबद्दल प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली अढी अन् त्यातून व्हायरल झालेल्या ‘बॉयकॉट ट्रेंड’ यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं प्रचंड नुकसान झालं. चित्रपटसृष्टीची वाताहात झाल्याबद्दल आणि या बॉयकॉट कल्चरबद्दल नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी भाष्य केलं.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ व शाहरुख खानचा ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला. आमिर खानचा चित्रपट सपशेल आपटला तर शाहरुखच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. त्यामुळे बॉयकॉटमुळे चित्रपटांवर परिणाम होतो हा समज प्रकाश झा यांनी खोडून काढायचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचाही उल्लेख केला आहे.

आणखी वाचा : मुकेश अंबानींचा एक सल्ला अन् ‘हे’ तीन नियम आहेत रणबीर कपूरसाठी महत्त्वाचे; अभिनेत्यानेच केला खुलासा

या विषयावर ‘एएनआय’शी संवाद साधतांना प्रकाश झा म्हणाले, “आपल्या लोकसंख्येच्या केवळ ५% लोकच ट्रोलिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतात, अन् सोशल मीडियावरील अशा गोष्टींना घाबरायची गरज काय? लोकांनी शाहरुख खानच्या चित्रपटाला बॉयकॉट केलं, पण प्रत्यक्षात घडलं काहीतरी वेगळंच. जर चित्रपट बनवण्यात मेहनतच घेतली नसेल तर पंतप्रधान मोदी यांचा बायोपिकही फ्लॉप ठरतो हे आपण पाहिलं आहे. मला वाटतं की विवेक ओबेरॉयचा तो चित्रपट चांगला होता, पण त्याचं काय झालं हे आपल्याला ठाऊक आहेच. खुद्द मोदींनीही त्या चित्रपटाची प्रशंसा केली पण तो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुलाखतीदरम्यान प्रकाश झा यांनी नव्या चित्रपटांचं कौतुक केलं. ’12th Fail’ या चित्रपटाचंही प्रकाश झा यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, “12th Fail सारखा चित्रपट इतका हीट ठरेल याचा विचार तरी कुणी केला होता का? अखेर चित्रपटाचं कथानक हेच सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, ते प्रेक्षकांना किती आपलंसं वाटतंय यावर सगळा व्यवसाय ठरलेला असतो. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे किंवा बॉयकॉटमुळे कधीच चित्रपटाचं नुकसा होत नाही.”