राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा या जोडप्याने नुकतीच आयसीसी यंग लीडर्स फोरममध्ये एकत्र हजेरी लावली. लग्नानंतर पहिल्यांदाच या जोडप्याने एकत्र मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आणि वैवाहिक जीवनातील मतभेद व भांडणं कशी सोडवतात, याबाबत माहिती दिली. राघव आणि परिणीती यांनी २४ सप्टेंबर २०२३ रोजी जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली होती.
या मुलाखतीत आप नेते राघव चड्ढा यांनी पत्नी परिणीती चोप्राबरोबरची भांडणं कशी टाळतात, याबद्दल सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून परिणीतीला हसू आवरत नव्हतं. “माझ्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच मला समजलं की पत्नी नेहमीच बरोबर असते, त्यामुळे जर तुम्हाला ते नीट समजलं की तुमच्यात कोणतेच मतभेद होत नाहीत. अर्थात, मतभेद आमच्यातही होतात. पण एक गोष्ट अशी ती म्हणजे कधीही भांडण झालं की ते न सोडवता झोपू नये,” असा सल्ला राघव चड्ढा यांनी दिला.
राघव चड्ढा यांनी त्यांचं भांडण झालं की ते कसं सोडवतात, याबाबत माहिती दिली. एकतर परिणीती तिचं म्हणणं राघव यांना पटवून देते किंवा राघव त्यांचं म्हणणं परिणीतीला पटवून देतात आणि अशा रितीने ते भांडणं सोडवतात.
या मुलाखतीत परिणीतीने राघव चड्ढांबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “आम्ही लंडनमध्ये भेटलो. आम्हाला आमच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम केल्याबद्दल गौरविण्यात येत होतं. राघवला राजकारण आणि मला मनोरंजन क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार देण्यात येत होते. आम्ही त्या कार्यक्रमात एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. मी, राघव आणि आयोजक सगळे एकमेकांना नाश्त्यासाठी भेटलो होतो,” असं परिणीतीने सांगितलं.