भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विविध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.

गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. सध्या रणदीप हुड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर रणदीप मुलाखतीमध्ये त्याच्या या चित्रपटावर काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य करत आहे. नुकतंच रणदीपने ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर हजेरी लावली अन् याविषयी विस्तृतपणे भाष्य केलं. याच मुलाखतीदरम्यान रणदीपला हा चित्रपट का केला याबद्दल विचारण्यात आलं. तसेच सध्या सत्तेत असलेल्या सरकाराच्या पाठिंब्यामुळे अशा प्रकारच्या विचारधारेचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत असा कयास बऱ्याच लोकांनी लावला, त्याविषयीही रणदीपला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं.

आणखी वाचा : “सहा कोटींची कार घेतली अन् आता सायकल का चालवतोस?”, चाहत्याच्या खोचक टिप्पणीवर कार्तिक आर्यनचं उत्तर

त्यावर उत्तर देताना रणदीप म्हणाला, “कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहना. हा चित्रपट करण्यामागील वास्तव मला ठाऊक आहे. हा चित्रपट मी सावरकरांवर झालेला अन्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवला आहे. यामध्ये माझी कुणीही मदत केलेली नाही. मी माझं घर दार विकून हा चित्रपट केला आहे. तुम्ही कोणत्या प्रोपगंडाबद्दल बोलत आहात? कोण ३० कीलो वजन कमी करून दीड वर्षाहून अधिक एका प्रोपगंडा चित्रपटासाठी मेहनत घेतं? मला माहितीये मी हा चित्रपट का बनवला आहे, त्यामुळे लोकांना याबद्दल काय वाटतं याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. ट्रेलर पाहूनच हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल अशी शक्यताही कॉमेंटच्या माध्यमातून नेटकरी वर्तवत आहेत.