Aamir Khan Opens Up On His Religious Views : आमिर खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्यानं ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बऱ्याच मुलाखती दिल्या. त्यामध्ये त्याने अनेक विषयांबाबतची त्याची मते स्पष्टपणे मांडली आहेत.
आमिर खानने नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याचे विचार मांडले आहेत. तो म्हणाला, “जेव्हा मी लोकांना भेटतो तेव्हा मी त्यांना माणूस म्हणून बघतो; ते कोणत्या धर्माचे आहेत हे पाहत नाही. त्यांच्यातील कलागुण मी बघतो”. पुढे आमिर म्हणाला, “कोणत्याही धर्माबाबत सार्वजनिक ठिकाणी मत मांडणं जोखमीचं आहे. त्यामुळे मी फारसं याबाबत बोलत नाही”.
आमिर खान असेही म्हणाला, “हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे. मी प्रत्येक धर्मातील लोकांचा आदर करतो”. आमिरने तो गुरू नानक यांच्या विचारांनी खूप प्रेरित आहे आणि सुचेता भट्टाचार्य करून त्याचे एक गुरूसुद्धा आहेत, ज्यांच्याकडून त्याला खूप काही शिकायला मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. याच मुलाखतीमध्ये अभिनेत्याने श्रीकृष्णाबद्दलही सांगितले आहे.
आमिर खान म्हणाला, “श्रीकृष्णाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्या कथा, भगवद्गीतेमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं”. आमिर खानने राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचे ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्दल सांगितले होते.
आमिर खानला या मुलाखतीमध्ये “तुझा शेवटचा चित्रपट जर कुठला असेल, तर तो कोणत्या विषयावर आधारित असेल, कसा असेल,” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्याने “मला महाभारतावर चित्रपट बनवायचा आहे आणि जगाला दाखवून द्यायचं आहे की, आपल्याकडे काय आहे. ‘सितारे जमीन पर’ २० तारखेला प्रदर्शित झाल्यानंतर मी या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहे. आम्हाला त्यासाठी अनेक दिग्दर्शकांची मदत लागणार आहे. याचे काही भाग बनवले जातील,” असे म्हटले होते.
आमिरने या मुलाखतीदरम्यान, त्याला श्रीकृष्णाची भूमिकासुद्धा साकारायला आवडेल, अशी इच्छादेखील व्यक्त केली होती. याच वेळी अभिनेता असेही म्हणाला, “महाभारत या चित्रपटासाठी काम केल्यानंतर मला असं वाटू शकतं की, बस आता यानंतर मला दुसरं काही करायचं नाहीये. कारण- या चित्रपटासाठी तितकी मेहनत घ्यावी लागणार आहे, ज्यानंतर कदाचित माझं समाधान झालेलं असेन आणि मी अभिनयातून निवृत्ती घेण्याचा विचार करेन”.