Sardaar Ji 3 Makers Defend Casting Hania Aamir : लोकप्रिय गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने २३ जून (सोमवारी) त्याच्या ‘सरदारजी ३’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता. येत्या २७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरही पाहायला मिळाली. ट्रेलरमध्ये तिला पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला.

‘सरदारजी ३’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबरचा चित्रपट प्रदर्शित करत असल्याने दिलजीत दोसांझला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यावर दिलजीत दोसांझने प्रतिक्रिया दिली. ‘बीबीसी एशियन नेटवर्क’च्या वृत्तानुसार दिलजीत म्हणाला, “आम्ही फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्यावेळी परिस्थिती चांगली होती. परंतु, त्यानंतर खूप काही घडलं आणि बऱ्याच गोष्टी आमच्या हातात नव्हत्या, त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करता देशाबाहेर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.”

दिलजीत पुढे म्हणाला, “निर्मात्यांनी चित्रपटासाठी खूप पैसे लावले होते. जेव्हा मी चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तणावपूर्ण वातावरण नव्हतं, त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित न केल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान होईल हे त्यांना माहीत होतं आणि आता परिस्थिती आमच्या हातात नाहीये, म्हणून निर्मात्यांच्या चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला मी पाठिंबा दिला.” अशातच आता चित्रपटाच्या निर्मात्यांनीही ‘सरदारजी ३’बद्दल सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘सरदारजी ३’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी म्हटलं की, “सगळ्यांच्या माहितीसाठी आम्ही हे सांगत आहोत की, आपला देश ज्या परिस्थितीतून सध्या जात आहे, देशात जे घडलं त्यापूर्वीच आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण केलेलं आणि त्यावेळी कुठल्याही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी नव्हती. या नाजूक काळात आम्ही आपल्या देशाबरोबर आहोत, त्यामुळे हा चित्रपट आम्ही भारतात प्रदर्शित करणार नाही.”

‘सरदारजी ३’च्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा चित्रपट ते भारतात प्रदर्शित करत नाही आहेत यासाठी त्यांचं कौतुक केलं, तर काहींनी यामधून हानिया आमिरची भूमिका असलेला भाग काढला नसल्याने राग व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २२ एप्रिल २०२५ रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला झाला होता. यावेळी २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. यानंतर भारत सरकाने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी आणली. त्यावेळी पाकिस्तानी अभिनेता फावद खान व भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपटसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. देशात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे या चित्रपटावर बंदी आणण्यात आली.