Shilpa Shetty : ६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून, त्यामुळे त्यांनी २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीसाठी फुकेतला जाण्याची परवानगी मागत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे सहलीसाठी जाण्याची परवानगी नाकारली. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या या सेलिब्रिटी जोडप्याने परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी प्रवास आणि हॉटेलच्या आगाऊ बुकिंगचा हवाला देत २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान सहलीसाठी परदेशात सहलीसाठी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना संमती नाकारली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधातलं प्रकरण काय?
दीपक कोठारी या मुंबईतील व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची भेट घेतली होती. राजेश आर्या नावाच्या माणसाने ही भेट घडवून आणली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. बेस्ट डील टीव्ही हे होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होता. तक्रारीनुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ७५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज १२ टक्के व्याजदरावर घेण्यात आलं होतं. या कर्जातून व्याज वाचावं म्हणून राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांनी कंपनीत आपण ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे असं दाखवलं. तक्रारदार दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार दर महिन्याला कर्जाची रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात परत करण्याचं आश्वासन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनीही दिलं होतं. मात्र या दोघांनीही हे आश्वासन पाळलं नाही असा आरोप दीपक कोठारींनी केला आहे. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक कोठारी काय म्हणाले होते?
शिल्पा शेट्टी या प्रकरणात जो ७५ कोटींच्या कर्जाचा व्यवहार झाला त्याची साक्षीदार होती. मात्र २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात शिल्पाने तिचं संचालक पद सोडलं. दीपक कोठारींच्या म्हणण्यानुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघंही आपले पैसे बुडवतील किंवा आर्थिक गैरव्यवहार करतील याची कल्पना सुरुवातीला आली नाही. मात्र नंतर त्यांना ही कल्पना आली ज्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. दरम्यान ज्या कंपनीसाठी व्यवहार करण्यात आला ती कंपनीही आता बंद झाली आहे. २०१५ ते २०२३ या कालावधीत आम्ही आमचा व्यवसाय वाढवू आणि तुमचे पैसे चुकते करु असं आश्वासन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पूर्ण केलं नाही असं दीपक कोठारी यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणातच मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांनही परदेश प्रवासाची संमती नाकारली आहे. स