‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. परेश रावल यांच्या चित्रपटातील एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. चित्रपटात परेश रावल यांनी साकारलेल्या बाबू भय्या या पात्राला चांगला प्रतिसाद मिळाला होता, तर या भूमिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे; त्यामुळे परेश यांच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. यानंतर चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार व सुनील शेट्टी यांनीदेखील याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली होती.
अशातच नुकतच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला “परेश रावल यांच्या चित्रपटात काम न करण्याच्या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने “या विषयावर बोलण्यासाठी ही जागा योग्य नाही” असं उत्तर दिलं होतं. यासह अभिनेते सुनील शेट्टी यांनीदेखील याबाबत काही मुलाखतींमधून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अशातच आता सुनील शेट्टी यांनी नुकतीच यासंदर्भातील त्यांची अजून एक प्रतिक्रिया दिली आहे. ‘झूम’शी संवाद साधताना त्यांना अभिनेता कार्तिक आर्यनला चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
‘झूम’शी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाले, “चित्रपट तेव्हाच अजरामर होतो जेव्हा प्रेक्षकांना त्यातील पात्र भावतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी किंवा परेश रावल नाही तर राजू, श्याम व बाबू भय्या या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या तिन्ही पात्रांना कोणी रिप्लेस करू शकत नाही आणि जेव्हा कार्तिकला चित्रपटासाठी विचारणा झाली होती, तेव्हा त्याला राजूच्या नाही तर चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. ते एक पूर्णपणे वेगळं पात्र होतं.” पुढे चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना सुनील शेट्टी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
‘हेरा फेरी’ चित्रपटांचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, “चित्रपटांना एवढं यश मिळालं याचं श्रेय दिग्दर्शक प्रिर्यदर्शन यांचं आहे. आम्ही जेव्हा चित्रीकरण करत होतो, तेव्हा त्यांनी बारकाइने सर्व सीनकडे लक्ष दिलं आणि त्यांना जसे सीन हवे होते तसेच त्यांनी काढून घेतले; कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घेतली.”