बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच लग्न करणार आहे. वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे. येत्या १५ फेब्रुवीराला हा विवाह होणार आहे. निवडक मित्र परिवाराच्या उपस्थितीत हे लग्न होणार आहे. मागच्यावर्षीपासून दिया वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
दिया मिर्झाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी दियाचे उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न झाले होते. पण ऑगस्ट २०१९ मध्ये लग्नाच्या पाच वर्षानंतर दिया आणि साहिल विभक्त झाले. त्यांचा घटस्फोट झाला.
कसा असेल विवाहसोहळा ?
येत्या १५ फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी विवाहबद्ध होतील. अत्यंत साधेपणाने घरच्या घरी हे लग्न होईल, असे माध्यमांनी म्हटले आहे. फार निवडक लोक या विवाह सोहळयाला उपस्थित असतील. मागच्यावर्षी दिया आणि वैभव परस्परांना डेट करत होते. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघाने सोशल मीडियावरुन विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये ते विवाहबद्ध झाले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते.
घटस्फोटानंतर काय म्हणाली होती दिया?
एक सेलिब्रिटी असल्यामुळे माझं प्रोफेशन मला दु:खी राहण्याची परवानगी देत नाही आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी चार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. आज या घटनेला ३४ वर्षे झाली. जर चार वर्षांची असताना मी हे दु:ख सहन करु शकते तर वयाच्या ३७ व्या वर्षी का नाही?, असं दिया म्हणाली होती.