सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासाठी गर्दी केल्याचं ठीकठिकाणी बघायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौत तसेच मराठी अभिनेते शरद पोंक्षे अशा काही कलाकारांनीही यावर भाष्य केलं आहे. आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या चित्रपटाबद्दल भाष्य करताना एक खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : ‘तुंबाड’च्या यशानंतर राही बर्वे यांच्या ‘गुलकंद टेल्स’ची जबरदस्त चर्चा; लवकरच ट्रेलर येणार भेटीला

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत असं केदार शिंदे यांचं म्हणणं आहे आणि याबद्दलच त्यांनी खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. केदार शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने २८ एप्रिल रोजी केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद दिला. आता केदार शिंदे यांच्या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी तर हे दोन्ही चित्रपट टॅक्स फ्री करावेत अशी मागणी केली आहे. ‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला अन् पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली आहे.