तमिळ चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता विक्रम सुगुमारन याचे सोमवारी निधन झाले. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम ४७ वर्षांचा होता. त्याचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रम सुगुरमारन मदुराईहून चेन्नईला बसने जात असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.
‘मधा यानई कूटम’ या चित्रपटासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक विक्रम निर्मात्यांना चित्रपटाची कथा सांगण्यासाठी मदुराईला गेला होता. तिथून परतत असताना त्याला छातीत दुखू लागलं. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आलं. विक्रमच्या निधनाच्या बातमीने तमिळ सिनेसृष्टीतील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता कायल देवराजने एक पोस्ट लिहून विक्रमला श्रद्धांजली वाहिली. विक्रम सुगुमारनचे पार्थिव चेन्नई येथील त्यांच्या घरी आणण्यात आले आणि नंतर जवळच्या स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. “मला खरोखरच या बातमीवर विश्वास बसत नव्हता,” असं कायल देवराजने लिहिलं आहे.
पाहा पोस्ट
सुगुमारनच्या आगामी सिनेमाचं नाव ‘थेरम पोरम’ होतं. त्याने १९९९-२००० मध्ये दिग्गज तमिळ दिग्दर्शक बाळू महेंद्र यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्याने ‘मधा यानई कूटम’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला, जो चांगलाच गाजला होता. त्याने शेवटचा दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘रावण कोट्टम’ होय. या चित्रपटात शंथनु भाग्यराज मुख्य भूमिकेत होते.