पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात घेणारा दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील अडथळे दूर झाले आहेत. पण, अभिनेता-निर्माता फरहान अख्तरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. फरहानच्या वक्तव्यामुळे त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शात अडथळे निर्माण होऊ शकतात. करण जोहरने चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने काढलेला तोडगा ही भयंकर मोठी चूक असल्याचे म्हटले होते. फरहाननंतर ‘रईस’ चित्रपटाच्या सह निर्मात्यांनीही पाच कोटी देण्यास नकार दिला आहे. त्यावर ‘मनसे’कडून फरहानला धमकी देण्यात आल्याचे कळते.

मिड डेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, प्रदर्शनाची वेळ जवळ येऊ दे मग बघू. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा हे लोक कुठे होते? आता अचानक प्रत्येकजण जागा झाला आहे. मग, ज्या निर्मात्यांच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार आहेत ते जवानांना मदत करण्यास तयार का झाले, असा सवालही खोपकर यांनी केला.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा समावेश असलेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला विरोध दर्शवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलवून यशस्वी मध्यस्थी केली होती. यावेळी राज यांनी पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रूपये जमा करण्याची प्रमुख अट घातली होती. निर्मात्यांनी ही अट मान्य केल्यानंतर मनसेचा ‘ऐ दिल है मुश्किल’ला असणारा विरोध मावळला होता. मात्र, या सगळ्या प्रकारावर फरहानने तीव्र नाराजी व्यक्त केलेली. तुम्ही काय करावे किंवा करू नये, हे सरकारही तुम्हाला सांगू शकत नाही. मग तुम्ही कोणाचे ऐकत आहात? तुम्हाला हिंसेचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या लोकांचे तुम्ही ऐकत आहात. हिंसेचा धोका हा फक्त तुम्हालाच नाही. तुमच्या घरातील मुलांना आणि कुटुंबियांनाही आहे. तुम्ही त्यांना या सगळ्यात का खेचत आहात? सरतेशेवटी हा सर्व प्रकार दुर्देवी आहे, फरहानने म्हटले होते. यावेळी फरहान अख्तरने भारत-पाक मुद्द्यावरून केवळ चित्रपटसृष्टीलाच लक्ष्य करण्याच्या भूमिकेवरही टीका केली होती. आम्ही तुम्हाला कायदे करण्यासाठी निवडून देतो. मात्र, हे कायदे केवळ चित्रपचसृष्टीलाच लावू नका. एवढेच असेल तर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार का थांबवला जात नाही, असा सवालही फरहान अख्तरने उपस्थित केला.