मराठी – हिंदूी चित्रपट आणि मालिकांमधून सातत्याने वेगवेगळया भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये. करोनाकाळात आणि त्यानंतर ‘२०० हल्ला हो’ आणि ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ या दोन चित्रपटांमधून उपेंद्रला वेगवेगळय़ा भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यातही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्याच्या वाटय़ाला कित्येकदा आली आहे. ‘शेंटिमेंटल’ असो वा आता ‘२०० हल्ला हो’ चित्रपटातील दुष्ट पोलीस अधिकारी असो त्याने प्रत्येक भूमिकेत काही वेगळेपणा देण्याचा प्रयत्न केला आहे. आताही नव्याने प्रदर्शित झालेल्या ‘फास’ चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत आहे. मात्र ही पोलिसाची भूमिका अधिक वेगळी आणि वास्तवदर्शी असल्याचे त्याने सांगितले.
यापूर्वीही ‘मुळशी पॅटर्न’, ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातील त्याने साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका गाजली, ‘मुळशी पॅटर्न’मधील खमका पण चांगला पोलीस अधिकारी तर इतका गाजला की त्याच्या भूमिकेची भुरळ अगदी सलमान खानलाही पडली. ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदूी रिमेकमध्ये उपेंद्रने साकारलेल्या पोलिसाची भूमिका सलमानने केली आहे. ‘फास’मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे किंवा इतर कोणत्याही चित्रपटात पोलिसाची भूमिका आहे म्हणून मी तो चित्रपट निवडतो असं अजिबात नाही आहे, असं उपेंद्र सांगतो. कथानक सुंदर असेल तर नक्कीच पात्रं कोणतंही असो ते आपोआपच बहरतं यावर आपला विश्वास आहे, असं तो म्हणतो. ‘फास’ हा चित्रपटच पूर्णपणे वेगळा आहे. फासमधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका ही अधिक वास्तवदर्शी असल्याचे त्याने सांगितले.
‘फास’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडण्यात आला आहे. हिंदूी चित्रपटांमध्ये किंवा अन्य मराठी चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे पोलिसांची भूमिका सर्वसामान्यपणे दाखवली जाते तसा अधिकारी इथे नाही. तो त्याच्या कामाप्रति निष्ठावान आहे, त्याला परिस्थितीचंही गांभीर्य समजतं आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे त्याला त्याचे काम पूर्ण करता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करायची इच्छा असूनही तो काही करू शकत नाही. समोरची परिस्थिती अन्याय्य आहे. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे हे लक्षात येऊनही त्याला काही करता येत नाही म्हणून त्याची होणारी तडफड या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे त्याने सांगितले. ‘फास’ सारख्या संवेदनशील विषयावरील चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली तर आम्हाला नक्कीच काम करायचा हुरूप येईल, असेही त्याने सांगितले. मराठी प्रेक्षक हा फारच सुज्ञ आहे, त्यामुळे नव्याने सुरू झालेले चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन पाहावेत, अशी अपेक्षाही उपेंद्रने व्यक्त केली. ‘फास’सारख्या आशयपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर आम्हाला खरंच खूप स्फूर्ती मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
मिळेल त्या चित्रपटात काम करण्याची घाई तो करताना दिसत नाही. मध्यंतरीच्या काळात त्याने हिंदूीत ‘तारा फ्रॉम सातारा’सारखी मालिकाही केली. त्याच्या मते चित्रपट म्हणजे कथाकथन असते. आशय हा प्रमुख भाग आहे चित्रपटाचा. मी मुख्य प्रवाहात आल्यापासून मला आत्तापर्यंत समांतर, आशयपूर्ण विषय मांडणाऱ्या चित्रपटांची ओढ कायम राहिली आहे, असे तो म्हणतो. हिंदूी चित्रपटांनी इंग्रजी चित्रपटांची जशी नक्कल करायची गरज नाही, तसेच मराठी किंवा कुठल्याही प्रादेशिक चित्रपटांनी हिंदूीची नक्कल करायची गरज नाही, असे मत त्याने व्यक्त केले. जेव्हा आपल्या मातीतील, वास्तवदर्शी विषय मराठी चित्रपटातून समोर येतात आणि जेव्हा ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून आपली मोहोर उठवतात तेव्हा खूप छान वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, हेही तो आवर्जून सांगतो.