2018 सालात आलेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चत आला आहे. आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या सिनेमात अनेक बडे कलाकार असूनही सिनेमाला फारसं यश मिळालं नव्हतं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा चांगलाच आदळला होता.

आता हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या सिनेमामुळे न्यायालयीन वाद निर्माण झालाय. जातीयवादाच्या आरोपाखाली न्यायालयाने अभिनेता आमिर खान तसचं निर्माता आदित्य चोप्रा यांच्यासह चौघांना नोटीस जारी केलीय. उत्तर प्रदेशमधील हरईपूर इथले रहिवासी असलेल्या हंसराज चौधरी यांनी 2018 मध्ये चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा, दिग्दर्शक विजय कृष्ण, अभिनेता आमिर खान यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सिनेमात मल्लाह जातीचा ‘फिरंगी’ ‘आणि ‘ठग्स’ या शब्दात उल्लेख करुन अपमान करण्यात आल्याचं तक्रारीत म्हंटल आहे. तक्रारदार हंसराज चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय घेतलाय.

‘केवळ नफा कमवण्यासाठी निर्मात्यांनी सिनेमाचं नाव असं ठेवलं आहे. प्रत्यक्षात या सिनेमातून अनेक प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत शिवाय या सिनेमातून मल्लाह समाजाची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय.

तर सिनेमाच्या घटना आणि पात्र काल्पनिक असून ते सिनेमाच्या सुरुवातीलाच नमूद केलं गेलंय. कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे तर मनोरंजानासाठी सिनेमाची निर्मिती केली जाते असं म्हणत दंडाधिकारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर हंसराज चौधरी यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने याचिकेवर पुर्नविचार करत आमिर खान, आदित्य चोप्रासह चौघांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी केलीय. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे.

2018 साली आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सिनेमात आमिर खान सोबत, बिग बी तसचं कतरीना कैफ, फातिमा सना हे बडे स्टार झळकले होते. मात्र सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.