भरजरी साडय़ा, त्यावर साजेसे दागिने, मेकअप.. मालिकांच्या राज्यामध्ये प्रत्येक सासू-सुनेला केवळ त्यांच्या भूमिकेमुळेच नाही, तर त्यांच्या पेहरावावरूनही ओळखले जाते. एखादी मालिका लोकप्रिय झाली, की त्यातील नायिकेने घातलेल्या साडय़ा, अनारकली, सलवार सूट बाजारात पाहायला मिळतात. त्यावरून त्यांच्या कपडय़ांची लोकप्रियता लक्षात येतेच. मालिकेतील कलाकारांच्या पेहरावाची हीच लोकप्रियता लक्षात घेऊन मालिकांमधील या लूक्सना गौरविण्यासाठी एकता कपूरने ‘टेलिव्हिजन स्टाइल अवॉर्ड्स २०१५’चे आयोजन केले आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर या पुरस्कारांसाठी परीक्षकाची भूमिका बजावणार आहे.

मालिकांमध्ये प्रत्येक कलाकाराला त्याच्या व्यक्तिरेखेनुसार विशिष्ट पेहराव आणि मेकअप दिला जातो. मालिकांच्या महिलाप्रेक्षक वर्गाचे या पेहरावावर बारीक लक्ष असते. त्यामुळे कित्येकदा बाजारात मालिका किंवा व्यक्तिरेखेच्या नावाने साडय़ा, ड्रेसपीस, अनारकली पाहायला मिळतात. अगदी सण समारंभाला जाताना अमुक नायिकेसारखा मेकअप किंवा हेअरकट करून घेण्यास महिलावर्ग प्राधान्य देताना दिसतो. ‘पवित्र रिश्ता’मधील अंकिताचे अनारकली, ‘साथिया’मधील गोपीच्या साडय़ा, ‘बालिकावधू’मधील आनंदीचा मांगटिक्का असे किती तरी ट्रेंड्स बाजारात मालिकांमुळे आले.
नेमकी हीच बाब हेरून मालिकांमधील सध्या गाजत असलेल्या स्टायलिंग ट्रेंड्सना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले असून, दिग्दर्शक करण जोहर याच्या परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. या पुरस्कारांची निर्मिती टीव्हीसम्राज्ञी एकता कपूरच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ या निर्मितीसंस्थेंतर्गत होणार असून, यामध्ये सध्याच्या सर्व हिंदी वाहिन्यांवरील मालिकांचा समावेश होणार आहे. टीव्हीवरील ‘स्टायलिश नायक/नायिका’, ‘स्टायलिश मालिका/शो’, ‘स्टायलिश खलनायिका’, ‘स्टायलिश सूत्रसंचालक’, ‘स्टायलिश स्पर्धक’ यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. मालिकांमध्ये अजूनही भारतीय परंपरागत कपडय़ांवर जास्त भर असतो आणि करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’सारख्या चित्रपटांमधून त्याचे भारतीय कपडय़ांवरील विशेष प्रेम आणि त्याची पारखी नजर प्रेक्षकांना दिसली आहे. त्यामुळे त्याला प्रभावित करण्यासाठी मालिकांच्या डिझायनर्स आणि स्टायलिस्टना विशेष मेहनत करावी लागेल, हे नक्की. तसेच त्याच्यासोबत भारतीय कपडय़ांच्या बाबतीत भारतातील आघाडीचा डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बॉलीवूडचा आघाडीचा छायाचित्रकार डब्बू रत्नानी हेही या पुरस्कार सोहळ्याचे परीक्षक आहेत. मार्च महिन्याअखेरीस या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण ‘कलर्स’ वाहिनीवर होणार असून, त्याचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मनीष पॉल करणार आहे.