आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये आमिरच्या जुन्या वक्तव्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर आमिरनं प्रेक्षकांना आपल्या चित्रपटावर बहिष्कार घालू नका असं भावनिक आवाहन केलं होतं. सध्या आमिर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच त्याने एसएस राजामौली, नागार्जुन, सुकुमार आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गज कलाकारांसाठी चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाबद्दल नागार्जुन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पाहिल्यानंतर नागार्जुन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक खास नोट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी आमिर खान आणि ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ पाहण्याचे सौभाग्य मिळालं. हा चित्रपट पाहिल्यानंतर मोकळ्या हवेत श्वास घेतल्यासारखं वाटलं. साधा आणि सरळ वाटणाऱ्या या चित्रपटाचा अर्थ खूप खोल आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवतो, रडवतो आणि विचार करायला भाग पाडतो.”

आणखी वाचा- “चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबीच का?” नागराज मंजुळेंच्या प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर

नागार्जुन यांनी आपल्या ट्वीटमध्ये मुलगा नागा चैतन्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, “हा चित्रपट तुम्हाला, ‘प्रेम आणि निरागसतेनं जग जिंकता येतं’ असा संदेश देतो. नागा चैतन्यला एक अभिनेता म्हणून यशस्वी होताना पाहणं माझ्यासाठी खास आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदन, लेखक अतुल कुलकर्णी आणि टीम, तुम्ही सर्वांनीच आमची मनं जिंकली आहेत.”

आणखी वाचा- …अन् आमिर खानने दिलं नागराज मंजुळेंना स्क्रिनिंगला येण्याचे आमंत्रण, वाचा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं असून या चित्रपटामध्ये नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.