Nana Patekar on Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आयुष्य संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेबद्दल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हुंडाबळी ही वृत्ती आहे. अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल. लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आणि संस्काराचा भाग आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मी असा खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी देईन”, असं नाना पाटेकर हुंडा प्रथेबद्दल बोलताना म्हणाले.
वास्तव नाकारता येणार नाही – नाना पाटेकर
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून अवाढव्य खर्चाची अपेक्षा, सामाजिक प्रतिष्ठा हे मुद्दे चर्चेत आले आहेत. लग्नातील दौलतजादा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांबद्दल नाना म्हणाले, “दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसं समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही.”
आम्ही समाजातील विसंगती मांडतो – नाना पाटेकर
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळे चाखायची नाहीत का? लग्नसोहळे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. काय मूर्खपणा सुरू आहे, ही चर्चा करण्यापेक्षा मी काय करू शकतो, हा विचार आपण करायला हववा. सिनेमा हे केवळ करमणुकीचे साधन नाही. समाजातील विसंगती आम्ही मांडतो. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचाही विचार करण्याची वेळ आली आहे.”
अवकाळी पावसामुळे थांबतंय मुलांचं शिक्षण – नाना पाटेकर
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामीण भागात मुलांचं शिक्षण थांबतंय, याकडे नाना पाटेकरांनी लक्ष वेधले. “अवकाळी, गारपीट यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पुरेसे नाही. खेड्यात शाळा लांब असल्याने पावसाळ्यात मुलांचे शिक्षण थांबते. हे टाळण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा, वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत,” असं नाना पाटेकर म्हणाले.